व्याख्यानमाला-१९७४

Vyakhyanmala 1974
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष दुसरे १९७४

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

"यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला" ही १९७३ साली सुरु झाली. त्यानिमित्ताने गतवर्षी ज्या थोर विचारवंतांची तीन व्याख्याने झाली; ही मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देताना मनाला एक समाधान जाणवते.

साहित्य, सौंदर्य, संगीत, क्रीडा, करमणूक या समाजजीवनाला समाधान देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगरपालिकेने या संदर्भात कराडची एक वैशिष्टयपूर्ण अभिरुची निर्माण केली आहे. त्याचबरोबर आजच्या गतिमान कालखंडात, नव्या पिढीतील समाजघटकांत चिकित्सक नि अभ्यासू वृत्ती वाढीस लागावी, सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा आणि स्थित्यंतराचा परिचय व्हावा ही निकडीची गरज आहे. समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते एका प्रयत्नवादी, अभ्यासू नि यशस्वी अशा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जन जागरणाचे; संस्काराचे, कार्य आरंभिले आहे!

यशवंतरावजी चव्हाण कराडचे सुपुत्र आहेत, अखिल भारतीय नेतृत्व त्यांच्या परिश्रमांना लाभलेले फळ आहे. त्यांचा वाढदिवस हा प्रत्येक कराडकराच्या जीवनातील एक महत्त्वाच्या भावनेने हेलावणारा दिवस आहे.

यशवंतरावाजी चव्हाण यांच्या स्वरुपात दिसणारे हे नेत्रदिपक प्रज्ञाप्रचीतीचे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व कलेकलेने साकारत गेले; त्याचा विचार नि उच्चार समाज परिवर्तनाला उपकारक ठरेल या भावनेने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात निश्चित औचित्य आहे! सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा परिचय होत होत राहिला; विचारविवेक-विमर्ष या विचार मंथनाच्या प्रक्रिया व्यक्तीच्या जीवनावर जर संस्कार करुन गेल्या तर कोणता सामाजिक आविष्कार दिसू शकतो त्याचे यशवंतरावजी चव्हाण हे मूर्तिमंत उदाहरण आहे !

जन्मत: पारंपरिक, सामाजिक किंवा आर्थिक सुबकतेचे वा प्रतिष्ठेचे आवरण यशवंतरावजींना लाभले नाही. प्रतिकूलतेची पाठशिवणी सतत चालू असताना, आत्मविश्वासाने, अभ्यासू वृत्तीने त्यांनी आपले 'ज्ञान दालन' प्रयत्नपूर्वक समुद्ध केले. ध्येयपूर्तीसाठी ठामपणे उभे राहून, अविचल मनोनिग्रहाने त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची साक्ष पटवली आहे. आकांक्षेकडे झेप घेणारी निष्ठा, वाणी, करणी, त्यांच्या विद्यार्थीदशेतील साधना आहे! म्हणून नव्या पिढीने त्यांच्या व्यासंगाचा नि प्रयत्नवादाचा अभ्यास केला पाहिजे असे वाटत राहाते.