व्याख्यानमाला-१९७४-२

समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे धैर्य नव्या पिढीने, यशवंतरावांच्या सहृदयतेने व अभ्यासू वृत्तीने दाखवावे. यशवंतरावांच्या एकाग्रतेने प्रत्येक समस्येचे मनन, चितन करावे, यशवंतरावांच्या तर्कशुद्ध विचार पद्धतीने स्वत:चे निष्कर्ष काढावेत आणि यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठेने व जिद्दीने ते निष्कर्ष व्यवहारात आणावेत ! यशवंतरावांच्या भक्तिभावाने समाजाची नि मातृभूमीची सेवा करावी हीच उत्कट भावना यामागे अनुस्यूत आहे !!

यशंवतरावांचे जीवन चरित्र हे नव्या पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणूनच नामदार यशवंतराव चव्हाण यांचे जीवन हा अभ्यासाचा विषय आहे, महाराष्ट्रातील सामाजिक नि राजकीय चळवळीचे प्रवाह समजून देणारा एक जीवनस्त्रोत खळाळून पुढे धावतो आहे अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागरणाचा उपक्रम सुरु करावा; त्यांच्या अभिष्टचिंतनाबरोबरच विचारचिंतनाचा सुरुवात करावी म्हणून हा सुयोग साधला आहे !

आमच्या निमंत्रणाला मान देऊन माननीय प्रा. ए. एम्. खान, पुणे, माजी न्यायमूर्ती वि. अ. नाईक. पुणे आणि श्री. सदाशिव बागाईतकर, पुणे या थोर विचारवंतांनी एक एक विचाराचे कोरीव लेणे मराठी मनावर कायमचे कोरुन ठेवले आहे. त्या सर्वांचे कृतज्ञ आभार मानणे आमचे कर्तव्य आहे !

थोर शब्दांचे हे 'अक्षर' स्वरुप प्रकट होताना प्रा. वि. पु. गोखले व श्री.श्रीनिवास कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहेत. कराडमधील या दोन्ही साहित्यसेवकांचा अशा कामावरील लोभ, उपक्रमांना रेखीव रुप देणारा ठरतो. म्हणून त्यांचे सप्रेम आभार मानताना आपलेपणाचा आनंदही साठलेला असतो.

श्रीदत्त प्रिटिंग प्रेसचे व्यवस्थापक नि कामगार यांनी ही पुस्तिका वेळेवर व सुबक छापून दिली त्याबद्दल आभारी आहे.

या व्याख्यानमालेत जे जे विचारमंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत 'अक्षर' करण्याच्या हेतूने प्रतिवर्षी व्याख्यानांची पुस्तिका प्रसिद्ध केली जावी हाही हेतू आहे. गेल्या वर्षीच्या व्याख्यानाची ही दुसरी पुस्तिका समाज पुरुषाच्या हाती देताना एकच प्रार्थना..

ना. यशवंतरावजींना  राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो ! त्यांच्या जीवनाचा आदर्श नव्या पिढीला जीवनाची विधायक दृष्टी देणारा ठरो !