व्याख्यानमाला-१९७४-३

व्याख्यान पहिले - दिनांक : १०-०३-१९७४

विषय - "भारतीय लोकशाही : काही विचार"

व्याख्याते - प्रा. ए. एम्. खान ( श्री. शाहू मंदिर महाविद्यालय, पुणे. )

अध्यक्ष महाशय आणि सन्मित्रहो :

'यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे' पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपण मला या ठिकाणी निमंत्रित केले याबद्दल खूप आनंद वाटतो. या व्याख्यानमालेतर्फे निरनिराळ्या वक्त्यांना बोलावून त्यांची निरनिराळ्या विषयांवर सलग तीन व्याख्याने आयोजित करण्यात येतं आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. व्याख्यानमाला सुरु करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

माननीय यशवंतराव चव्हाण यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व फार मोठे आहे. यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे येण्यामध्ये त्यांच्याबद्दलची माझी आदराची व कृतज्ञतेची ही भावना आहे.

आपला विषय मी चिकित्सक बुद्धीने, तटस्थवृत्तीने आणि सूत्ररुपाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जी. डी. एच. कोल या विख्यात अर्थ-शास्त्रज्ञाने म्हटले आहे की व्याख्यात्याने आपल्याला जे काही सांगायचे आहे त्याची त्याने अगोदर स्पष्ट कल्पना द्यावी. त्यानंतर त्याला जे सांगावयाचे आहे ते त्याने सांगावे व शेवटी जे काही सांगितले त्याची उजळणी करावी. हे सूत्र माझ्या आजच्या व्याख्यानाला लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

माझा आजचा विषय "भारतीय लोकशाही : काही विचार" असा आहे. 'लोकशाही' या शब्दाचा अर्थ सर्वांना माहित आहे. त्याबद्दल येथे विस्तृतपणे सांगण्याचे प्रयोजन नाही. पण 'काही विचार' या शब्दात संदिग्धता आहे. त्यामध्ये मला जे आज सांगावयाचे आहे त्याची रुपरेषा देणे आवश्यक आहे. भारतीय लोकशाही यामधील अभिप्रेत अर्थ, त्यातील आशय, त्याचप्रमाणे येथील लोकशाही पद्धत व लोकशाहीची यंत्रणा आणि आजच्या भारतीय लोकशाहीपुढे असणा-या अडीअडचणी, समस्या विशेषत: आर्थिक, सामाजिक व कायदा आणि सुव्यवस्था याबद्दलची आव्हाने, या मुद्यांवर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे.