व्याख्यानमाला-१९७४-५

पक्षबल : दोन पर्यायी पक्ष तुल्यबळ असले की अस्थिरतेचाही प्रश्न निर्माण होतो असे दिसून येते. सध्या ब्रिटनमध्ये हुजूरपक्ष व मजूरपक्ष हे तुल्यबळ झाले आहेत. त्यामुळे ते सरकार केव्हा कोलमडेल हे सांगात येत नाही. तेथील विचारवंत आता म्हणू लागले आहेत की ब्रिटनमध्ये सर्वांचे मिळून एकच राष्ट्रीय सरकार स्थापावे. ब्रिटनची ही लोकशाही यंत्रणा पाहिली तर असे दिसून येते की अगदी संख्येच्या फरकामुळे दोन पक्षांच्या तुल्यबलतेतून राजकीय अस्थिरताच निर्माण होते.

सेवावृत्ती : लोक मतदान करतात व लोकप्रतिनिधी निवडून येतात. या प्रतिनिधींमधून थोडेच लोक अधिकारपदावर येतात; आणि त्यांच्याकडून सत्ता राबविली जाते. तेव्हा साहजिकच असा प्रश्न निर्माण होता की थोड्या लोकांच्या हाती सत्ता असल्याने त्यापासून काही धोका निर्माण होता का? पण ज्यावेळी सेवावृत्ती असते त्यावेळी अशाप्रकारे सत्ता हाती आली तरी ही सत्ता राबविण्यापासून भय नाही. यामध्ये सेवावृत्ती महत्त्वाची आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान हीथ यांनी राजीनामा दिल्यानंतर १० डाऊनिंग स्ट्रीट हे आपले निवासस्थान सोडून ते तेथून ताबडतोब दुसरीकडे राहावयास गेले. इंग्लंडच्या या पंतप्रधानाला स्वत:चे घर नाही. हे आपल्या नुकतेच वाचनात आले असेल. मागे पंतप्रधान मॅकमिलनने जेव्हा राजीनामा दिला तेव्हा आपला फोन तोडू नये म्हणून विनंती केली. पण फोन तोडण्यात आला. त्यांनी पुन्हा विनंती केली की मी दवाखान्यात आहे तोपर्यंत फोन तोडू नका. पण कायदा तो कायदा असे उत्तर त्यांना मिळाले. याबाबतीत मा. यशवंतराव चव्हाण यांचेही उदाहरण उल्लेखनीय आहे. ज्यावेळी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी "मी या महाराष्ट्राचा पहिला चाकर आहे," असे उद्गार काढले ही सेवावृत्ती असेल तर कितीही मोठी सत्ता प्राप्त झाली तरी त्यापासून धोका निर्माण होण्याचे कारण नाही.

लोकांचे कर्तव्य : अशी सेवावृत्ती लोकप्रतिनिधींमध्ये असली पाहिजे. लोकशाही राबवावयाची म्हणजे ती आपण सर्वांनीच राबवली पाहिजे. ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एकदा मते दिली की आपले काम संपले असे कोणी समजू नये. मत देणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. येथून पुढे खरे प्रत्यक्ष काम.

प्रशासकांचे कर्तव्य :  लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये जो मोठा दुवा आहे तो म्हणजे प्रशासकांचा त्यांनीही आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने केले पाहिजे. प्रशासकांनी आपल्या कामात ढिलाई अगर बेफिकिरी दाखवून चालणार नाही. जर बेफिकिरी असेल तर चांगली ध्येय-धोरणे राबवता येणे शक्य नाही. लोकशाही अत्यंत प्रभावी व्हावयाची असेल तर लोकप्रतिनिधी आणि जनता यांचेमधील जो प्रशासकांचा दुवा आहे त्याने निष्ठेने काम केले पाहिजे. हे माझे काम नाही. मी हे काम माझ्या सवडीने करीन अशी प्रवृत्ती राज्यकारभारास पोषक नाही. तिटकारा, तुसडेपणा, आळस, विलंब झटकून समाजहितासाठी काम करणे आवश्यक आहे. हा माझा समाज आहे, ही माणसे माझी आहेत या आपुलकीने काम केले पाहिजे. कामातील सचोटी व क्षमता यामुळे मोठी कामेही अनायासे पार पाडतात.