व्याख्यानमाला१९७३-१

जन्मत: पारंपरिक सामाजिक किंवा आर्थिक सुबकतेचे वा प्रतिष्ठेचे आवरण यशवंतरावजीना लाभले नाही. प्रतिकूलतेची पाठशिवणी सतत चालू असतांना, आत्मविश्वासाने, अभ्यासूवृत्तीने त्यांनी आपले ‘ज्ञान दालन’ प्रयत्नपूर्वक समृध्द केले. ध्येयपूर्तीसाठी ठामपणे उभे राहून, अविचल मनोनिग्रहाने त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची साक्षपटवली आहे. आकांक्षेकडे झेप घेणारी निष्ठा, वाणि करणी त्यांच्या विद्यार्थि दशेतील  साधना आहे!  म्हणूनच नव्या पिढीने त्यांच्या व्यासंगाचा नि प्रयत्नवादाचा अभ्यास केला पाहिजे असे वाटत राहाते.

भारतीय सामाजिक नि राजकीय क्षेत्रात ते “ एक विचार”  म्हणून गौरवले जातात. पण ही त्यांना लाभलेली ईश्वरदत्त गोष्ट नाही. त्यांचा हा होणारा गौरव त्यांनी सतत व्यासंगाने, चिकित्सक वृत्तीने नि अभ्यासाने आत्मसात केलेले “साधना” आहे भावी काळाचा अचूक वेध घेणारी त्यांची प्रज्ञा, त्यांच्या एकाग्र चिंतनाची परिणती आहे. बालवयातही सवंग लोकप्रियतेचा मोह त्यांना झाला नाही. सत्यशोधक सामाजिक चळवळीच्या पेक्षा कॉंग्रसच्या व्यापक ध्येय धोरणाचा परिचय करून घेण्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते;  भावनेपेक्षा विचाराला शरण जाणे ही त्यांची वृत्ती; त्यांच्या राजकारण पटुत्वाची यशोध्वजा ठरली!

राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो कोणत्याही गंभीर समस्येचा विचार एकाग्रतेने करावा. आपल्या सहकारी मित्रा बरोबर साधक चर्चा करावी आणि भावनावश न होता जो निर्णय तर्कशुध्द, वस्तुनिष्ठ आहे तो शिरोधार्यं मानून कोणत्याही परिणामाची मुलाहिजा न ठेवता त्याचा पाठपुरावा करावा हा यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव विषेश आहे!  क्वचित, स्वत:च्या मनासला किवा सहकार्यांच्या मनाला क्लेशकारक निर्णयही; एकदा तर्कशुध्द, वस्तुनिष्ठ नि अंतिम श्रेयस्कर आहे अशी खात्री झाली की तो प्रथम उच्चारण्याचे मनोधर्म यशवंतरावच दाखवू शततात ! या विज्ञान युगातील गणक यंत्रातून बाहेर पडणारे बिनचूक उत्तरा इतके अचूक निर्णायक उत्तर स्विकारण्याची त्यांची मानसिक तयारी त्यांच्या प्रज्ञेचा चमत्कार वाटतो. राजकारणातील अत्यंत नाजूक नि अत्यंत कठीण प्रसंगी अनेक वेळा याचा पडताळा आला आहे.

परिस्थितीचे अवहान स्वीकारण्याची त्यांची तयारी स्वत:च्या व्यासंगावरील नि अभ्यासू धारणेवरील जबरदस्त विश्वासच! मुंबई राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा नि भारताच्या राजकारणातील त्यांच्या धाडसी भूनमिकांची ओळख सर्वानाच जवळून झालेली आहे. राजकीय वा सामाजिक चळवळीची परिणिती कोठे थांबेल याचे अचुक निदान यशवंतरावजी करू शकतात;  अशावेळी त्यांची शोधकदृष्टी, आपल्या निदानाचे समर्थन करताना बोधक ठरते. पडितांच्या सभेत तर्कशुध्द नि समर्पक दाखल्यानी बिनतोड युक्तिवाद करणारी त्यांची भाषाशैली; राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर खास प्रसादिक नि प्रादेशिक लेणे घेऊन, जनसामान्यांच्या मनाचा कब्जा करते !

कॉंग्रेसचा एक सैनिक म्हणून घेण्यात यशवंतराव स्वत:ला धन्य समजत आलेले आहेत. पण ते सैनिक आहेत त्याही पेक्षा ते कुशल संघटक आहेत. सतत कार्याकर्त्यांचा संच उभा करून त्यांना ध्येय निष्ठेने आणि कार्य प्ररणेने गतिमान करण्यात त्याना लाभणारे यश इतरांनी हेवा कराव असे आहे !