महाराष्ट्रातील दुष्काळ - ९

लोकसंख्येचा स्फोट, शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रचंड प्रमाण, पावसाच्या लहरवर अवलंबून असलेली शेती, काही अपवाद सोडल्यास राष्ट्रीय पातळीवर समृद्ध व आधुनिक शेती निर्माण करण्यात आलेले अपयश, शेतीचे अकार्यक्षम उत्पादन व उत्पादकता, स्वातंत्र्योत्तर काळातील व विशेषतः १९६६ नंतरची उद्योगधंद्यांची अत्यंत असमाधानकारक विकासाची गती या अशा विविध कारणांमुळे दुष्काळावर मात करणे शक्य झालेले नाही.  समृद्ध शेतीच्या आधारे औद्योगिक सामर्थ्य वाढविल्याशिवाय आणि औद्योगिक सामर्थ्याचा उपयोग शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणांत शेती विकासाच्या कार्यक्रमाला व शेतकरी समाजाला मदत करण्यासाठी होऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय परंपरागत पद्धतीने दुष्काळावर इलाज शोधणे शक्य होणार नाही.  किंवा लोकांच्या हालअपेष्टांही कमी होऊ शकणार नाहीत.

भारतीय अर्थव्यवस्थेत, विशेषतः औद्योगिक आघाडीवर पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांनंतर (१९६६) गुंतागुंती निर्माण होऊ लागल्या आहेत.  १९६६ नंतर भारत अन्नधाघ्याचे बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची ऐतिहासिक गोष्ट घडली.  तथापि, दुर्दैवाने त्याच सुमारास औद्योगिक विकासाची गतीही कमी होण्यास सुरुवात झाली.  आता तर भारतीय आर्थिक आघाडीवर काही धोक्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  केवळ दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठीच नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीनेही ही धोक्याची चिन्हे लक्षात घेऊन भारतीय समाजाने निर्धाराने वाटचाल केली नाही तर भारत अभूतपूर्व अरिष्टात सांपडण्याचा धोका आहे.  प्रयत्‍नांची शिकस्त करून आणि कुठे चुकले आहे हे लक्षात घेऊन भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र बनविले पाहिजे.  दुष्काळ पडला किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर ताबडतोबीने मानवतेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करावयास पाहिजे.  परंतु अर्थव्यवस्थचो सर्वांगीण विकास केल्याशिवाय व राष्ट्राचे औद्योगिक सामर्थ्य वेगाने वाढविल्याशिवाय नैसर्गिक संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य अर्थव्यवस्थेत येणार नाही.  आंतरराष्ट्रीय बाजार पेठेच्या चढाओढीत आपण यशस्वी रीतीने भाग घेऊ शकू अशी उत्पादनक्षमता आपणास औद्योगिक आणि शेतीच्या क्षेत्रात साध्य करता आली पाहिजे.  उत्पादन खर्च कमी, कार्यक्षम उत्पादन आणि कमाल उत्पादनक्षमता, आधुनिकता इत्यादि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिरिरीने तरूण पिढीपुढे आली पाहिजे आमच्या मातृभूमीला आर्थिक दृष्ट्या बलशाली आणि पहिल्या श्रेणीचे राष्ट्र बनविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.  अशा देशभक्तीच्या भावनेनेच पक्षभेद विसरून आमची तरूण पिढी प्रेरित झाली पाहिजे.  अशा प्रकारच्या राष्ट्र-विकासाच्या कार्यक्रमांत सवंग लोकप्रियतेच्या कार्यक्रमांना स्थान असणार नाही, हे उघड आहे.  अशा सवंग लोकप्रियतेच्या कार्यक्रमांमुळे मूलभूत विकासांच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष होईल आणि मूलभूत विकासाच्या कार्यक्रमांना भांडवल व साधनसामुग्री यांची कमतरता भासेल.