महाराष्ट्रातील दुष्काळ - 219

परिशिष्ट ऊ
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई

संस्थेचा परिचय
केलेल्या व भावी कामाविषयी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई :  परिचय

कालप्रवाहावर ज्याचे ठसे उमटतात, ते जतन करण्याची जबाबदारी समाजाची असते.  म्हणूनच थोर दिवंगत नेते मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांचे उचित असे स्मारक मुंबई शहरात उभे करण्याचा संकल्प केला गेला आहे.  ह्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई' ही संस्था १९८५ स्थापन झाली आहे.

यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत.  राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला.  राष्ट्रीय जीवनात त्यांनी महाराष्ट्राला उच्च स्थान दिले.  प्रखर स्वातंत्र्य सेनानी, सावध राजकारणी, मुत्सदी, सुसंस्कृत विचारवंत, लोकाग्रणी म्हणून त्याचे स्थान लोकमानसात चिरंतन राहाणार आहे.

राष्ट्रीय मूल्यांवर त्याची डोळस श्रद्धा होती.  गरीब, मागास सामान्य माणसातही आत्मविश्वास जागविण्याचे आणि त्यांच्या जागृत संघटित कर्तृत्वातून आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.  कैक पिढ्या दबलेले, मराठी कार्यकर्तृत्त्वाचे स्त्रोतमुक्त करण्यात ते यशस्वी झाले.  त्यांनी दिलेली दिशा आणि दृष्टी कैक पिढ्यांना मार्गदर्शन ठरणार आहे.

चर्चासत्रे, परिसंवाद व शिबिरे

कै. यशवंतराव लोकशाहीच्या यशासाठी मुक्त सिंचन, वैचारिक सर्वकषतेसाठी चर्चा आणि एकत्र बसून एकमेकांच्या भूमिका समजून घेणे व देणे ह्यावर भर देत असत.  ह्या भूमिकेचा पाठपुरावा करून आतापर्यंत प्रतिष्ठानाने आयोजित केलेली शिबिरे इत्यादिकांची माहिती खालीलप्रमाणे (१० ऑक्टोबर १९८९ पर्यंत).  मा. यशवंतरावांच्या जीवनाशी संबंधित कागदपत्रे इ. यांचे संशोधन करण्यासाठी एक केंद्र स्थापन करण्यात आले आहे.  ह्याशिवाय नवयुवक, तरूण कार्यकर्ते आणि महिलांच्या प्रबोधन कार्यास चालना मिळावी म्हणून नवभारत युवक आंदोलन आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ ह्या अनौपचारिक संघटनांना सक्रिय चालना दिली आहे.

खाली दिलेला तक्ता पाहण्यासाठी क्लिक करा

तक्ता A


पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठ्या आनंदाने आलो आहे.  येताना मी मनात विठ्ठलाला म्हणालो, 'चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे, तिला आम्ही आज साकडे घातले आहे.  तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहात आली.  या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवितो आहोत.  महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून 'ग्यानबा तुकाराम' म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो.  त्या ग्यानबा तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत, विठ्ठला, आता तू जा.  तिथे तुझ्या चंद्रभागेला भेट.  जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास आणि तुझी मनापासून भक्ती करणार्‍या तुझ्या सगळ्या भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास.  तशीच तुझी भक्ती करणार्‍या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणार्‍या गरीब शेतकर्‍याने आज तुझी चंद्रभागा अडवली आहे.  त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा.  तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस !'  विठ्ठलाला मी ही मनोभावे प्रार्थना केली आहे.  तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केली आहे.  पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की, निव्वळ प्रार्थनेने हे सर्व घडणार नाही.  त्याकरिता तुम्हाला कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे.  त्यासाठी जिद्दीने काम करण्याचा आपण निश्चय करू या.

यशवंतराव चव्हाण
(उजनी धरणाच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणातून)