विविधांगी व्यक्तिमत्व-१५

टिळक हायस्कूलमध्ये टिळकांचे विचार आणि आयुष्य या संबंधाने विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेत असत या निमित्ताने टिळकांच्या विचारांचा चांगला अभ्यास झाला व १९३१ मध्ये पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळविले.

साहित्य क्षेत्रातील प्राथमिक भूमिकाहि वाचकांची, ती यशवंतरावांनी अत्यंत निष्ठेने व चोखपणे पार पाडलेली आढळते. त्यांच्या वाचनासंबंधीचे व त्यांच्या लेखक भाषणातून आलेले संदर्भ नुसते जरी एकत्र केले तर त्यांच्या जिज्ञासेच्या कक्षा किती विशाल होत्या याचा प्रत्यय येतो. मनाची केव्हाहि विश्रब्ध अवस्था झाली की पुस्तक काढून वाचीत बसणे, प्रवासात नवनवीन पुस्तके नजरेखालून घालणे हा यशवंतरावांचा आपल्याकडच्या राजकारण्यामध्ये अतिदुर्लभ असलेला छंद होता. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयावरचे उत्तम निवडक ग्रंथ सात हजाराचेवर आहेत आणि ही ग्रंथ संपदा त्यांनी अतिशय काळजीपूर्वक जपलेली दिसून येते. परदेशात गेल्यावर पुस्तकांच्या दुकानांना भेटी देणे हा एक त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे. हेतू हा की आपल्या देशात न मिळणारे एखादे नवे पुस्तक शोधावे. हा शोध सतत चालू होता. अशी पुस्तके मिळताच ती खरेदी करून त्यांनी वैयक्तिक ग्रंथसंग्रह वाढविला.

यशवंतरावांचे इतिहास, राजकारण व वाङ्‌मय हे व्यासंगाचे विषय होते. या व्यासंगाला जिव्हाळा असतो. त्या जिव्हाळ्यातून पुस्तकांची निवड होते या विषयांशी संबंधित व्यक्तींची चरित्र तर यशवंतराव हटकून वाचत असत. त्यामुळे दुसरे महायुद्ध हा त्यांच्या वाचनाचा आवडता विषय बनला होता.

या  दुसर्‍या महायुद्धाने जगाच्या राजकीय नकाशाचीच पुनर्रचना केली. त्यामुळे अनेक राजकीय, आर्थिक व लष्करी संघर्षापासून आपल्या विषयाची सुरवात करावी लागते. हे युद्ध संपवून बरीच वर्षे झाली तरीही अजून या युद्धाच्या विविध अंगाचा विचार करणारी व नवनवीन माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध होतच असतात. अशी पुस्तके शोधून काढून ती वाचण्यात यशवंतरावांना विशेष आवड होती. असे ते स्वत:च ‘आवड-निवड’ या आपल्या लेखात नमूद करतात.

या पुस्तकात असे काय असते की, ज्यामुळे यशवंतराव अशी पस्तके मुद्दाम मिळवून वाचतात. हा प्रश्न यशवंतरावांच्या चाहत्यांना आणि त्यांचे वाङ्‌मय वाचणार्‍या रसिकांनाही पडणे साहजिकच आहे. कारण यशवंतराव प्रत्येकवेळी ठामपणे आपल्या आवडी-निवडी संबंधी सुतोवाच करीत असतात. तेथे ही युद्धविषयक पुस्तके वाचण्याचे त्यांचे कारण सांगताना यशवंतराव म्हणतात, ‘या युद्धाचा इतिहास, त्याच्याशी संबंधित नेत्याचे स्मृतिग्रंथ, घडामोडीच्या पाठीमागे रोमहर्षक प्रयत्‍न या युद्धाच्या सुरवातीची व शेवटची अनेकांनी केलेली वेगवेगळी मीमांसा हे सर्व अत्यंत वाचनीय वाङ्‌मय आहे’ या युद्धाच्या पार्श्वभूमिवर अनेक कादंबर्‍या लिहिल्या गेल्या. यांची आठवण या निमित्ताने यशवंतरावांना होते.

यशवंतरावांना इतिहास आणि राजकारण विषयक ग्रंथही वाचण्याची आवड होती. ते तर असे म्हणायचे की, इतिहास आणि राजकारण हे एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे विषय आहेत.

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी व वैचारिक आंदोलने या बाबतीत अद्ययावत रहावयाचे असेल तर नित्य वाचीत जावे, हा मंत्र स्वभावच बनावा लागतो.