विविधांगी व्यक्तिमत्व-१८

यशवंतराव चव्हाण: नवमहाराष्ट्राचे शिल्पकार

देवराष्ट्रेसारख्या एका लहानशा खेड्यात जन्माला आलेल्या एका साध्या बेलिफाचा मुलगा हा खंडप्राय देशाचा उपपंतप्रधान झाला. ही चढण स्वकर्तृत्वाच्या व प्रेमळ मातेच्या स्वकर्तृत्वाच्या बळावर, संस्कारपूर्ण शिकवणुकीवर, सहकार्‍यांच्या निष्ठेवर आणि अनेक अदृष्य आशिर्वादांच्या बळावर यशवंतराव चव्हाण चढून गेला.

एक उत्तम प्रशासक आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजींचा पं. नेहरुंनी अनेक वेळा गौरव केलेला आहे. भारताच्या नेतृत्वापदाच्या संदर्भात नेहरुं नंतर कोण असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला होता अशा तर्‍हेची अखिल भारतीय पातळीवरील पुढार्‍यांची प्रशस्तिपत्रके याशवंतरावांना मिळाली होती. परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती, विशेषतः ती ज्या पद्धतीने झाली ती, यशवंतरावांच्या नेतृत्वाचे खरे प्रशस्तिपत्र समजावयाला हवे. कारण, प्रशासक आणि राजकीय नेता या दोन्ही नात्यांनी आवश्यक असलेले गुण ज्या ठिकाणी एकवटून व्यक्त झालेले पहावयास सापडतात अशी यशवंतरावांची कामगिरी म्हणजे विशाल द्विभाषिकाचा कारभार कार्यक्षमतेने चालवून, नवमहाराष्ट्राची निर्मिती त्यांनी सुकर आणि निश्चित केली होती, ही होय.

महाराष्ट्र राज्य निर्माण होणार हे निश्चित झाल्यापासून त्याचे श्रेय कोणाचे व किती याबद्ल एक प्रकारची अहमहमिका सुरु झाली. सर्व श्रेय काँग्रेसला किंवा यशवंतरावांच्या नेतृत्वाला देणे वस्तुस्थितीला धरुन होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीला आणि तिने केलेल्या चळवळीला श्रेयाचा मोठा भाग दिला पाहिजे. आणि खुद्द यशवंतरावांनी समितीच्या कार्याचे महत्त्व मोकळेपणाने मान्य केले आहे. मराठी जनतेने इतर मतभेद बाजूस सारुन या प्रश्नावर जी एकजूट दाखविली तिला मुख्य श्रेय दिले पाहिजे. परंतु संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ज्या वातावरणांत आणि ज्या पद्धतीने झाली त्याचे पुष्कळसे श्रेय यशवंतरावांना दिले पाहिजे. आणि भारतीय लोकशाहीच्या उपासकांचे दृष्टीने तरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती एवढेच महत्त्त्व ही निर्मिती ज्या पद्धतीने झाली त्या पद्धतीला आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती ज्या पद्धतीने झाली तिचा विचार करीत असतांना जी एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती अशी की, लोकशाही पद्धतीला अनुसरुन आणि भारतीय संदर्भाशी सुसंगत अशा रीतीने आणि वाटाघाटीने हे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनुकूल वातावरण या राज्याला जन्मापासून लाभले आहे. याला यशवंतरावांचे नेतृत्व बव्हंशी कारणीभूत आहे यात शंका नाही. विशाल द्विभाषिकाचे मुख्यमंत्री या नात्याने यशवंतरावांनी जे काम केले त्यायोगे दोन मुख्य गोष्टी साधल्या. भारतीय नेतृत्वाचा विश्वास संपादन करुन मुंबई शहर एकभाषी मराठी राज्याचा भाग बनविण्यास ज्या शंका, संदेह, अविश्वास यामुळे विरोध होत होता त्याचे निराकरण केले. त्यामुळे यशवंतरावांच्या शब्दाला दिल्लीमध्ये महत्त्त्व प्राप्त झाले. मुंबईसह महाराष्ट्रांच्या निर्मितीला विरोध करणार्‍या नेत्यांचा प्रभाव त्या मानाने कमी झाला. आत्मविश्वासाचे सामर्थ्य यशवंतरावांच्या भूमिकेमागे उभे राहिले. कारंतु आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाने केवळ भारतीय नेतृत्वाचाच विश्वास यशवंतरावांनी संपादन केला नाही, तर खुद्द मुंबई राज्याचे सहकार्‍यांचा विश्वास संपादन करुन या राज्याच्या भिन्न भिन्न प्रादेशिक घटकांचाहि पाठिंबा मिळविला. गुजराथ आणि महाराष्ट्र यांच्या निर्मितीपूर्वीच्या वाटाघाटी ज्या बंधुभावाच्या वातावरणांत आणि गुण्यागोविंदाने झाल्या त्याला यशवंतरावांनी गुजराथी सहकारी व गुजराथी समाज यांचा संपादन केलेला विश्वास बव्हंशी कारणीभूत होता हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याने निःसंकोचपणे महाराष्ट्र राज्याला दिलेला पाठिंबा आणि विदर्भातील सहकार्‍यांनी वाटाघाटीनंतर आणि कांही थोड्या खळखळीनंतर महाराष्ट्र राज्यांत सामील होण्यास दर्शविलेली तयारी ह्यालाही यशवंतरावांनी या दोन्ही प्रदेशांत संपादन केलेला विश्वास कारणीभूत होता यांत शंका नाही. एवढेच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्र समितीची भूमिका कट्टर विरोधाची असतांनासुद्धा हा विरोध राजकीय मतभेदांच्या पातळीवर राहावा, त्यांतून कटुतेची भावना निर्माण होऊ नये या दृष्टीने यशवंतरावांनी विरोधकांबरोबर वागण्याचे जे धोरण स्वीकारलें होतें त्यामुळे महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर तीव्र लोकमत प्रभावी रीत्या संघटित झालें असूनहि वातावरणांत फार कटुता निर्माण झाली नाही., आणि महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न वाटाघाटींनी सुटूं शकला. अर्थात् यशवंतरावांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणार्‍या एस्. एम्. जोशी प्रभृतीनाहि या संबंधात मोठें श्रेय दिलें पाहिजे