यशवंत चिंतनिका ८

राजसत्तेचे विकेंद्रीकरण

लोकशाही व राजसत्तेचा विकासासाठी उपयोग कारावयाचा, हा मार्ग एकदा स्वीकारला, की सत्ता-संघर्षाला टाळता येत नाही. ग्रामीण क्षेत्रात नवे नेतृत्व निर्माण होण्याची आशा या कार्यक्रमाने निर्माण केली आहे. काही ठिकाणचा अनुभव कदाचित आशादायी नसेलही, परंतु विकेंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल मागे घेता कामा नये. अनुभवांच्या प्रकाशात आत्मटीका जरूर व्हावी. मला एकदा माझे एक मित्र म्हणाले, की या विकेंद्रीकरणाने जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही नवे ‘साहेब’ उभे केलेत, पण विकासाची प्रेरणा घेतलेल्या कार्याकर्त्यांची साखळी कोठे आहे? ही टीका कदाचित सार्थ असेलही, पण सत्तेची नवी स्थाने निर्माण केल्यानंतर प्रथमप्रथम हे अनुभव अपरिहार्य आहेत. पण त्यामुळे खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा एकदा आत्मनिरीक्षण करून पुढे पुढेच पावले टाकली पाहिजेत, अशी माझी श्रध्दा आहे.