यशवंत चिंतनिका १०

युगपुरूष गांधीजी

युगपुरूष जेव्हा आपल्या युगप्रवर्तक कार्याची सुरूवात करतो, तेव्हा असेच काहीतरी होणे स्वाभाविकच मानले पाहिजे. व्याकरणाचे जुने नियम तो जणू फेकून देतो. फूटपट्टी तो मोडून टाकतो, स्वत:च्या गायकीला साजतील, असे नवीन स्वर आणि ताल बसवितो आणि नवे सूर आळवू लागतो. गांधीजी प्रथम जेव्हा भारतात कार्य करू लागले, ते नेमके कोणत्या क्षेत्रात उतरणार, याबद्दल जाणकारांनी वेगवेगळे अंदाज केले असणे शक्य आहे. कोणाला वाटले असेल, की गांधीजी सामाजिक कार्याला वाहून घेतील. कोणाला वाटले असेल, की ते रातकीय कार्याला प्राधान्य देतील. ‘आधी सामाजिक सुधारणा, की आधी राजकीय चळवळ’ असा एक मोठा वाद महाराष्ट्रात त्यापूर्वी रंगून गेला होता व त्याचे खोल परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सार्वजनिक जीवनावर उमटले होते.

परंतु गांधीजींनी जो मार्ग स्वीकारला, तो अगदी वेगळा. सामाजिक, राजकीय आर्थिक, इतकेच काय, परंतु धार्मिक, शैक्षणिक अशी वेगवेगळी क्षेत्रे त्यांनी अलग मानली नाहीत. त्यांनी असा काही तरी संकलित, मूलभूत व मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला, की त्यामुळे सर्व विस्मयचकित झाले.