यशवंत चिंतनिका ११

क्रांतिकारक गांधीजी

गांधीजींनी चळवळीच्या तंत्रामध्ये क्रांती केली. त्यांनी प्रत्येकाकडून कृतीची अपेक्षा केली व प्रत्येकाला जमेल व साधेल, अशी कृतीची साधना त्याला सांगितली. त्यामुळे गांधीजींच्या चळवळीत शिक्षित-अशिक्षित हा भेदच नष्ट झाला. किंबहुना शिक्षित व्यक्तीने कोणताही अहंगंड बाळगू नये, यावर गांधीजींनी भर द्यायला सुरूवात केली. पोशाखातला थाट, इंग्रजी भाषेचा वापर, राहणीमानाचा दर्जा, इत्यादी ज्या गोष्टी सुधारणेची लक्षणे बनत होती, त्यांना गांधींजी कटाक्षाने रजा दिली. स्वत:ते इतका साधा पोशाख घालू लागले की, बॅरिस्टर असून ते एखाद्या शेतक-याप्रमाणे पोशाख घालत. या गोष्टीमुळे गांधी बहुजनसमाज यांच्यातील अंतर एकदम कमी झाले. पुढे तर ते पंचाच नेसू लागले व त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, भारतातील कोट्यवधी दरिद्री बांधवांच्या हद्याचे दार त्यांना सताड उघडले गेले. बहुजनसमाजात व तत्कालीन राजकारणी माणसांत जी दुर्लंघ्यदरी होती, ती एकदम बुजवली.