यशवंत चिंतनिका ६

स्वातंत्र्याच्या स्वप्नाची पूर्ति

सुख एवढंच होतं की, स्वातंत्र्याची स्वप्नं पाहत असलेला भारत स्वतंत्र झाला होता. १५ ऑगस्ट १९४७ ला यमुनेच्या काठावर स्वातंत्र्य मूर्तरूप बनून उभं होतं. कालपर्यंत एक अमूर्त कल्पना मूर्त रूप धारण करून उभी असलेली दिसत होती आणि साक्षात दर्शनानं सारा शीण संपला होता. १४ ऑगस्टच्या रात्री आम्ही, माझे मित्र-सहकारी, मुंबई होतो आणि मध्यरात्री सचिवालयावर फडकणारा स्वातंत्र्य-तिरंगा पाहून अननुभूत आनंदानं फुलून गेलो होतो. ४२ च्या आंदोलनातील दिवस आणि रात्री मनासमोर उभ्या राहत होत्या. कृतार्थ भावनेचा तो दिवस. स्वातंत्र्याबद्दल आम्ही बोलत होतो आणि ते स्वातंत्र्य प्रत्यक्षात पाहत होतो-याच देही, याच डोळा. हजारो स्वातंत्रवीर, हुतात्मे, य़ुगपुरूष तो स्वातंत्र्याचा सोहळा आकाशातून लकलकत्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्याबद्दलची अतीव कृतज्ञता मनातून आणि डोळ्यांतून ओसंडत होती. संकेत पुरा झाला होता. रणांगणावर लढणा-या सैनिकानं विजयाचा बिगूल ऐकावा, विजयाचा झेंडा समोर फडफडताना पाहावा, त्याच्या चित्तवृत्ती अमृतानं जशा न्हाऊन निघतात, तसा मी स्वातंत्र्यामृतानं अंतर्बाह्य ओलाचिंब बनलो होतो. सुख, सुख म्हणून मी ज्याचा उल्लेख केला, ते हेच होते!