यशवंत चिंतनिका १

‘चले जाव!’

गांधींची ‘चले जाव !’ ची घोषणा झाली होती आणि ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी सारेच तयारीला लागले होते. सातारा जिल्हा तर अगोदरच जागृत जिल्हा. लोकविलक्षण स्वातंत्र्ययुध्दात हिरिरीनं उडी घ्यायचं आम्ही मुंबईतच ठरवल. ब्रिटिशांनी धरपकड सुरू केली होती. बडे नेते गजाआड झाले होते. आमच्या वाट्यालाही तेच येणार होतं. म्हणून गुप्तपणानं सातारा जिल्हात पोचायचं आणि उठाव करायचा, असे डाव आखण्यात आम्ही गुंतून गेलो. आणि तेच केलं. सातारा जिल्हातलं बेचाळीसचं आंदोलन हा एक प्रदीर्घ इतिहास आहे. त्याची पानं किती उलटवावीत! जन्मभर आणि जन्मांतरी आठवणीत राहतीत, अशा त्या सा-या आठवणी आहेत. तिथला तो भूमिगतांचा इतिहास भूनमिगतच राहावा, असं वाटतं. सारेच श्रेयाचे वाटेकरी. ते श्रेय कुणाकडे कमी-अधिक करून वाटता येण्यासारखं नाही. त्या आंदोलनाचतील भूमिगत अवस्थेतील काळ, पत्नी आणि बंधूंची धरपकड, मला स्वत:ला झालेली अटक आणि भूमिगत अवस्थेतील अनेक रोमांचकारी प्रसंग आठवताना अभिमान आणि अनुकंपा यांचं काही चमत्कारिक मिश्रण मनात तयार होत राहतं. घडलं ते सारं रोमांचकारी, हे तर खरंच!