यशवंत चिंतनिका ४

विविधतेने नटलेला भारत

भारताच्या निरनिराळ्या भागांत हिंडून आल्यावर आणि भारतातील विविधता, तेव्हा भारत म्हणजे काय, याची मला कल्पना आली. कृष्णा, कोयना आणि गोदावरीच्या तीरांवरील भारत मी पाहिला होता. परंतु सिंधूच्या तीरावरील, लेहच्या परिसरातील भारत, ब्रह्मपुत्रेच्या द-याखो-यांतील भारत, गंगाकाठचा भारत, नागाभूमीत पर्वतराजीवर उभा असलेला भारत, नर्मदा, तापी व साबरमतीच्या तीरांवरील भारत आणि दक्षिणेत रामेश्वरापर्यंत पसरलेला, नारळ- पोफळींनी शाकारलेला भारत, गोमंतकातील काजूसारखा आटोपशीर भारत, सागराच्या धडका परत फिरविणारा लांबच लांब किना-याचा भारच, असा हा विविधतेने नटलेला भारत पाहिला, डोळे भरून पाहिला, रोमहर्षक काव्य मनात साठवले. देशाटनाने बरेच काही साध्य झाल्याचा प्रत्यय आला. भारताचे वर्णन करणारी पुस्तके पुष्कळ वाचली होती. त्यामुळे भारत जेवढा समजला, त्याच्यापेक्षा किती तरी पटीने अधिक ज्ञान देशाटनाने मिळाले.