यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ३

३. यशवंतरावांचे वेगळेपण (वसंतदादा पाटील)

यशवंतरावाजी चव्हाण हे एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले होते.  त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न किंवा आयुष्यातील काही महत्त्वाकांक्षा बाळगण्याबद्दल काही मर्यादा होत्या.  परंतु मनात महत्त्वाकांक्षा फार मोठी होती.... आणि आपण शिकले पाहिजे याबद्दल त्यांच्या मनात विश्वास होता.  श्रद्धा होती.  त्यामुळे ते शिकत राहिले.  शिकताना आलेल्या अनेक अडचणींवर त्यांनी मात केली आणि अखेरीस ते एलएल.बी. झाले.  शिक्षणासंबंधात जरी त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा होती तरी सार्वजनिक जीवनाची त्यांना आवडही लहानपणापासून होती.  विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये काम करावयाचे आणि त्याद्वारे, त्या आधारे देशामध्ये चांगले काम करून घ्यावयाचे यासाठी आपले सारे आयुष्य ते खर्च करीत होते.  राजकारणात त्यांनी अगदी तरुणवयापासूनच भाग घेतला.  त्यामुळे त्यांना सभांमध्ये बोलण्याची चांगल्या प्रकारे जाण होती.  एका बाजूला ते वाचनही करीत होते.  त्यामुळे ते आपले विचार लोकांपुढे अतिशय प्रभावीपणे आणि उत्तम रीतीने मांडत असत.

१९४६ साली प्रथमतः ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले.  त्यानंतर त्यांनी येथे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम केले.  १९५२ साली पुन्हा एकदा ते निवडणुकीस उभे राहिले व निवडून आले.  आणि त्यानंतर त्यांनी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम केले.  मध्यंतरीच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या रूपाने एक ज्वलंत प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झाला होता.  त्या वेळेस दोन विचार त्यांच्या मनात पूर्वीपासून होते.  एक म्हणजे सबंध देशात चाललेल्या एका प्रवाहाबरोबर जायचे की स्वतंत्रपणे आपले याबाबतचे विचार मांडून त्याबद्दल आग्रह धरायचा, त्यासाठी पडेत तो त्याग करायचा काय हे ते दोन विचार त्यांच्या मनात त्या वेळेस होते.  अर्थात कोठलाही त्याग करण्याच्या बाबतीत ते कधीच पाठीमागे राहिले नव्हते.  १९३० साली जेव्हा प्रथमतः यशवंतरावजी स्वातंत्र्याच्या चळवळीत पडले तेव्हा वयाने लहान असूनही त्यांना शिक्षा झाली होती.  पुढे १९४२ ची क्रांती सुरू झाली आणि त्या वेळेसही त्यांना तुरुंगवास घडला.  कोठल्या तरी कामामध्ये दबून राहण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.  उलट एखाद्या कारणाने ते दाबले गेले तर उफाळून येऊन नेटाने कामाला लागत असत.  संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत शेवटी त्यांनी निर्णय घेतला की, विशाल महाराष्ट्र चालवावयाचे.  त्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही एका बाजूला आनंदाची गोष्ट होती, पण त्यामध्ये महाराष्ट्र सुखी नव्हता, समाधानी नव्हता, तर नाराज होता.  त्या वेळच्या त्यांच्या विचारप्रणालीमुळे चळवळ करणारे तसेच अन्य लोकही यशवंतरावांना चांगले म्हणत नसत, तर त्यांना सूर्याजी पिसाळ म्हणत असत.  म्हणजे एका बाजूला त्यांना या गोष्टीचे दुःख होत असे आणि दुसर्‍या बाजूला त्यांना राज्यही चालवावे लागत होते.  हे करीत असताना त्यांनी असा विचार मांडला होता की, देशाच्या नेतृत्वाबरोबर राहायचे.  जे काही प्रश्न सोडवून घ्यावयाचे ते त्या वेळच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन सोडवायचे असा त्यांचा स्वभाव होता.  त्यासाठी जो प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांच्या मनाला वाटत असे त्याकरिता तो प्रश्न नेतृत्वाला बरोबर घेऊन सोडवावयाचा.  त्यासाठी त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंना बरोबर घेऊन राहावे लागले.  त्यांच्यानंतर इंदिरा गांधी त्या वेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या.  त्यांना बरोबर घ्यावे लागले.  जी गोष्ट घडली होती ती त्यांना बदलावयाची होती.  त्यासाठी पंडितजींना बरोबर घेऊन त्यांचे मन वळविणे आवश्यक होते.  त्याकरिता त्यांनी योग्य संधी साधली व पंडितजींना बरोबर घेऊन सांगितले की, ''आपल्या येथे विशाल महाराष्ट्र चालणार नाही, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे.''  त्या वेळीच संयुक्त महाराष्ट्र झाला.  तेव्हा या मंडळींचे साहाय्य झाले.  असे करताना राज्य चालविण्याच्या कामात अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली व संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याच्या कामामध्ये ते यशस्वी झाले.  महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये यशवंतरावाजींनी आणला.