माझ्या राजकीय आठवणी ४१

परिशिष्ट २

वयाच्या ६५ व्या वर्षपूर्तीचेवेळी झालेल्या सत्कार समारंभाचे इतिवृत्त

समर्थ : दिनांक २० ऑगष्ट १९७०

(आमच्या विशेष प्रतिनिधीकडून)

कृष्णाकाठच्या विद्यापींठात राजकीय शिक्षणाचे पाठ गिरवले.

“चाळीस वर्षापूर्वीचा राजकीय इतिहास जनतेसमोर यावा म्हणून त्या पिढीतील सा-यांचा प्रातिनिधिक व प्रतिकात्मक सत्कार असे या सोहळ्याचे स्वरुप आहे. मृत्यूचा क्षण जवळ आला तरीही न हालणारा तो धैर्यवान माणूस अशीही व्याख्या करता येईल स्वातंत्र्य टिकविण्यासाठी ध्येयवादी व धैर्यवान माणसांची गरज आहे. त्यांच्या कार्याची सतत आठवण राहिली पाहिजे.”

“मंदिराचा शोभिवंत कळस आपल्याला दिसतो, पण हा डोलारा पेलणा-या मंदिराच्या पायातील भरभक्कम दगड दिसत नाहींत.  जनतेला आमच्यासारखे नेते दिसतात, आमचे फोटोही छापून येतात, पण समाजासाठी झिजणारे श्री. हरीभाऊ लाड यांच्यासारखे चंदनाचे खोड समाजाला कां दिसू नये” असे भावपूर्ण उद्गार केंद्रीय अर्थमंत्री श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी कराडातील जुन्या पिढीतील एक श्रेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. हरीभाऊ लाड यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना काढले. व्यासपीठावर गेल्या चाळीस वर्षात राष्ट्रीय चळवळीमध्ये आघाडीवर असलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये दे. भ. दादासाहेब आळतेकर, गौरीहर सिंहासने, व्यंकटराव पवार, काशीनाथ देशमूख आदि उल्लेखनीय होत. या सत्कारसमितीच्या वतीने श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते श्री. हरीभाऊ लाड यांना एकवीस हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. यापैकी अकरा हजार रुपयाचा निधी कराडच्या जनतेने व दहा हजार रुपये अर्थमंत्री चव्हाणांनी जमा केले होते. याचवेळी सौ. लाड यांचाहि सत्कार करण्यांत आला.

नवीन कार्यकर्त्यांना आपुलकीच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन घडावे व जुन्या पुढीच्या सेवेचा विसर पडू नये याकरिता हा सत्कार-सोहळा आयोजित केल्याचे नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणांत सांगितले.

दे. भ. दादासाहेब आळतेकर यांनी श्री. हरिभाऊ लाड यांच्या अर्पित भावनेतील प्रखर देशभक्ति विषद करून सांगताना म्हटले, बाह्य उपचारावर कुणाच्याहि सामर्थ्याची कल्पना येत नाही. त्याकरिता कार्य करण्याची अपूर्व शक्ति असावी लागते. गांधीजींचा मीठसत्त्याग्रह ज्याच्यात संचारला होता, अशापैकी हरिभाऊ एक आहेत. १९२३ सालच्या कराड शहरातील पहिला सत्त्याग्रही म्हणून त्यांची नोंद स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहितांना करावी लागेल, त्यांच्या समर्पित जीवनामध्यें स्वातंत्र्याबद्दलची भक्ति दिसून येते. पारतंत्र्य धुडकावण्याची शक्ति यांच्यामध्यें होती. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्यें सर्वांत उशीरा सुटणारा सत्याग्रही म्हणून त्यांचा गौरव करावा लागेल.