माझ्या राजकीय आठवणी ३९

माझ्या कुमार वयांतील कराड गांवचे चित्र आज मी डोळ्यासमोर आणतो, तेव्हां ते सारे गांव देशभक्तीच्या एका भावनेनें मंतरलेले-भारलेले होते असे दिसते. त्या भावनेने सारा समाज आणि त्यातही समाजांतील तरुण पिढी भारली गेली होती. देशासाठीं काय करू नि काय न करू अशी स्थिती समाजांतील आबालवृद्धांची झाली होती. शाळा कॉलेजातून शिकणा-या मुलांच्या मनावर भावनेचा विलक्षण पगडा बसलेला होता. कायदेभंग स्वदेशीच्या भावनेंने देशांतील कोपरानकोपरा भारून गेला होता.

या भावनेचे लोण मी रहात होतो त्या कराडगांवीही पोंचले होते. श्री. पु. पां. गोखले,  श्री. गणपतराव  आळतेकर, गणपतराव बटाणे हे त्याकाळचे स्थानिक पुढारी म. गांधींच्या स्वराज्याचा आणि कायदेभंगाचा मंत्र घरोघरीं पोचवीत होते. या मंत्रामध्ये गांवांतील जलपाषाणांनाहि देशभक्तीची स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य होते. मग माझ्या वयाची जी तरूण मुले होती, ती या मंत्रानें भारली गेली यांत आश्चर्य कसले?                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     या कालचे सारे वातावरणच देशभक्तिीच्या मंत्राने मंतरलेले होते असे मी म्हटले तर ती अतिशयोक्ती होऊ नये. दरवर्षी भरणारी काँग्रेस अधिवेशनें म. गांधी, पं. नेहरू यासारख्या पुढा-यांची जाहीर भाषणे आणि अनेक विविध चळवळीच्या रुपानें मा. गांधींनी एखाद्या यज्ञकुंडाप्रमाणें धगधगीत ठेवलेला परकीय राज्यसत्तेविरुद्धचा असंतोष. यामुळें सा-या देशात राजकीय जागृतीचे ‘न भूतो न भविष्यति’ असे पर्व सुरू झाले होते. समाजांतील कांहीं हट्टी, मूर्ख आणि करंटे लोक सोडून दिले तर बाकी सर्व जनता देशभक्तीच्या भावनेने तापून निघाली होती. म. गांधींच्या स्वातंत्र्य युद्धांत स्वयंस्फूर्तीने सामील झालेल्या अशा लक्षावधी सैनिकापैकी मी एक होतो.

घरांत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाहि विद्या व्यासंगाची मला लहनपणापासून आवड असे. त्यामुळें प्राथमिक शाळेमधून सातवीची परिक्षा पास झाल्यानंतर क-हाडच्या टिळक हायस्कूलमध्यें मला घालण्यांत आले. हायस्कूलमध्यें प्रवेश केल्यानंतर अभ्यासाव्यतिरिक्त दोन गोष्टीची मला विशेष आवड उत्पन्न झाली. यापैकीं एक म्हणजे तालमीची आणि दुसरी म्हणजे निरनिरळ्या देशांतील देशभक्तांची चरित्रे वाचण्याची होय. छत्रपती शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, आगरकर, जोतीबा फुले यांची चरित्रे मी याच काळांत वाचून काढली. श्री. हरीभाऊ लाड, श्री. शिवाजीराव बटाणे या समवयस्क आणि समानवृत्तीच्या मित्रांचा लाभही मला याच काळांत झाला आणि मग या सर्व वाचन, मनन आणि चिंतनामधून माझा मनोपिंड पोसला गेला. उदात्तता, त्याग, तपश्चर्या, सेवा या गोष्टींची आवड माझ्या मनांत निर्माण झाली. श्री. लाड आणि श्री. बटाणे यांच्या सहाय्यानें इंग्रजी तिसरीमध्यें असतानाच मी क-हाडमध्ये ‘शिवाजी महोत्सव आणि गणेशोत्सव’ हे दोन उत्सव सुरू केले. गणपती उत्सवासाठी राष्ट्रीय मेळा सुरू केला आणि लोकजागृतीसाठी प्रभातफेरीचा कार्यक्रम सुरू केला.