विरंगुळा - १३

हे साहित्य माझ्या संग्रही अप्रकाशित अवस्थेत आहे असं 'साप्ताहिक सकाळ' चे संपादक श्री. सदा डुंबरे यांना समजलं तेव्हा या विषयी दिवाळी अंकासाठी एक विशेष लेख लिहिण्यासंबंधी त्यांनी सुचविलं. तो लेख लिहिला आणि २००४ च्या दिवाळी अंकात देखण्या स्वरूपात तो प्रसिद्ध झाला. दिवाळी अंक प्रसिद्ध झाला ता. ६ नोव्हेंबरला आणि त्याच दिवशी सायंकाळी मुंबईहून वाचकाचा पहिला अभिप्राय, पहिली पसंती दूरध्वनीवर मिळाली. समक्ष भेटून, फोनवरून, पत्ररूपाने अभिप्राय सत्र सुरूच राहिलं. व्यासंगी पत्रकार आणि मिष्कील लेखक श्री. अशोक जैन यांनी तर 'समस्त' दिवाळी अंकांतील 'ग्रेटेस्ट स्कूप' अशी या लेखाची भलावण केली. श्री. मुकुंदराव किर्लोस्कर यांनी 'अप्रतिम' या एकाच शब्दात या लेखाबद्दलचा अभिप्राय असल्याचं कळविलं. विदर्भ, खानदेश (जळगांव), मराठवाडा (औरंगाबाद), पश्चिम महाराष्ट्रातील वाई, सातारा, कराड, कोल्हापूर, राधानगरी, सांगली येथून अनेकांनी फोन केले, पत्रं पाठविली.

सर्वांचा सांगावा हाच की, यशवंतरावांचं साहित्य, ग्रंथ वाचण्यास उत्सुक आहोत. 'विरंगुळा' ग्रंथप्रकाशनाची काही प्रकाशकांनी तयारी दर्शविली. आग्रह केला. यशवंतरावांसंबंधी आदर असणारांनी भेटीला बोलवलं. काही मित्रांकडे चर्चेसाठी मी स्वत:च गेलो. उशीर झाला आहे, तुमचंही वय झालं आहे तेव्हा ही जबाबदारी शक्य तितक्या लवकर हातावेगळी करा हा त्यांचा सल्ला.

प्रकाशनाचे प्रस्थान ठेवावंच लागेल. प्रस्थान ठेवलं परंतु हा अडथळ्यांचा, जिकीरीचा प्रवास मुक्कामापर्यंत पोहोचणार का हा प्रश्न भेडसावत राहिला. येथेही यशवंतरावांची पुण्याई मदतीला आली! आयुष्यभर निरलसपणे, निरपेक्षतेने त्यांनी केलेली जनसेवा, पुण्याईच्या रूपाने प्रकट झाली की काय कोण जाणे!

ग्रंथ निर्मितीच्या प्रस्तावाला सहकार्याची आणि वित्त सहयोगाची तयारी 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान' (मुंबई) या विश्वस्त संस्थेनं सर्वप्रथम दर्शविली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. शरद पवार यांनी सहयोगाची अनुमती दिली. सेक्रेटरी श्री. शरद काळे यांनी त्यानुसार पत्राद्वारे कळविलं.
यशवंतरावांचे विचार महाराष्ट्रात निरनिराळ्या जिल्ह्यात, तालुक्यात नव्या पिढीमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्याचं विघातक कार्य, प्रतिष्ठान करीत आहे. यासाठी विचार मंच, युवा व्यासपीठ, महिला व्यासपीठ माध्यमं निर्माण करण्यात आली असून चर्चा, अभ्यास शिबिरं, प्रकाशनं, व्याख्यानं, प्रोत्साहनपर अनुदान असे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे. 'विरंगुळा'मध्ये यशवंतरावांचे जे विचार ग्रथित झाले आहेत ते नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास प्रतिष्ठानच्या सहयोगामुळे बहुमोल मदत उपलब्ध होण्याचा मार्ग सुलभ झाला. सहयोग देऊन प्रतिष्ठाननं उपकृत करून ठेवले आहे.

ग्रंथ प्रकाशनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो 'माईर्स' पुणे, वर्ल्ड पीस सेंटर (विश्वशांती केंद्र, आळंदी) या 'यूनो' प्रणित संस्थेचे संस्थापक आणि यूनोनियुक्त केंद्रप्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांचा! डॉ. विश्वनाथ कराड यांना यशवंतराव ही व्यक्ती आणि त्यांचं शैक्षणिक कार्य, जागतिक शांततेच्या संदर्भात त्यांनी प्रसृत केलेलं कार्य आणि विचार, याबाबत कमालीचा आदर आहे. एम. आय. टी. या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या गुणवान विद्यार्थ्याला यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक देण्याचा परिपाठ त्यांनी सुरू ठेवला आहे. लातूर येथील त्यांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बांधलेल्या हॉस्पिटलचं नामकरण यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल असं केलं आहे. या आदराच्या पोटी डॉ. कराड यांनी 'विरंगुळा' साठी सक्रिय सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. प्रत्यक्षात दिलं.