अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 11

फेब्रुवारी महिन्यांत श्रीवर्धनजवळच्या जसवली गावी जाहीर सभेत बोलतांना मी म्हटलें की, "जर मजजवळ कोणी असें सांगूं लागले की यशवंतरावांच्या हातून महाराष्ट्राचें कधीहि भलें होणार नाही, ते महाराष्ट्राला खड्ड्यांत टाकल्यावांचून राहणार नाहीत, तर ते त्याला ठासून सांगन की, यशवंतरावांच्या हातून असे कधीहि होणार नाही आणि क्षणभर वाईट होईल हें गृहीत धरलें तर मी त्यांच्यावर विश्वासून त्यांच्याबरोबर खड्ड्यांतहि जावयाला तयार होईन." एवढा दांगडा विश्वास प्रत्येकाने त्यांचेवर टाकला तरच वैभवशाली महाराष्ट्राचें स्वप्न त्यांचेकडून साकार होऊं शकेल.

"पंडित पंतांना पाहतांच लोकमान्य टिळकांची मला आठवण होत असे, " असे उद्गार यशवंतरावांनी ता. ९ मार्च रोजीं.पं. पंत यांना चौपाटीवरील सभेंत श्रद्धांजलि अर्पण करताना काढले. केवढी ही दोनहि महापुरुषांबद्दल त्यांची श्रद्धा ! छत्रपति श्री. शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व पंतप्रधान नेहरु यांच्या आशीर्वादाने यशवंतरावांच्या हातून महाराष्ट्र सर्वतोपरी उन्नत व सुखी झाल्यावाचून राहणार नाही.

गेल्या ४।। वर्षांपासून मी त्यांच्या सहवासांत आहें. मला त्यांचे जे अनुभव आले ते मी वाचकांसमोर यशाशक्ति ठेविले आहेत. मला राष्ट्रीय कार्याची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक होत. ते १९९७ सालीं चांद्याला, माझ्या जन्मगावी, आले होते. तेव्हापासून तों आजतागायत महाराष्ट्राच्या राष्ट्रीय क्षेत्रांतील उलाढालींचा इतिहास माझ्या समोर होता. म्हणून यशवंतरावांचे राजकीय जीवन मला चांगले पारखतां आलें व त्यावर माझ्या अनुभवाचे शिक्के लावतां आले.
अवास्तव स्तुति करणें गैर असते. परंतु प्रस्तुत लेखात मी जे दोन स्तुतिपर शब्द लिहिले आहेत ते वस्तुस्थितीला धरून आहेत, असेंच मला वाटतें.

त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा लेख पुरा करतांना परमेश्वराला प्रार्थना करतों की, ते शतायुषी होवोत.


"नव्या महाराष्ट्र राज्यांत आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणें हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदु मानतों. त्याचबरोबर नव्या राज्यांत शासनाच्या द्वारें लोकांची अधिक कार्यक्षम रीतीने सेवा घडेल अशा प्रकारें शासन यंत्रणेची पुनर्घटना व सुधारणा करण्यासहि आताच चालना मिळाली पाहिजे."

"१९४८ सालीं गांधीवधानंतर महाराष्ट्रांत जाळपोळीच्या रुपाने घडलेल्या सामाजिक चुकीचे परिमार्जन करण्याच्या हेतूने, तत्कालीन जळीतपीडितांची कर्जें मी, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुहुर्तावर, माफ केलीं आहेत. मराठी समाजांतील सर्व थर एकत्र आले म्हणजे अटकेपार झेंडा लागतो, ही इतिहासाची साक्ष मला माहिती आहे."
(सांगली येथे दि. १६ मे रोजी जळीतपीडितांनी केलेल्या सत्काराला उत्तर देतांना)