लोकनेते यशवंतराव चव्हाण - १६

१९६५ हे साल भारत-पाक यांच्यातील लढाईच्या धुमश्चक्रीचे होते. यादरम्यान यशवंतरावांच्या मातोश्री विठाबाई या खूप आजारी होत्या. कराडहून त्यांना उपचारासाठी मुंबईला आणले गेले. वय झाले होते. आयुष्यभर खूप कष्ट करून ती माता थकलेली होती. १८ ऑगस्ट १९६५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. यावेळी यशवंतराव दिल्लीत होते. देश युध्दाच्या खाईत असल्याने यशवंतरावांना आपल्या मातेचा अखेरचा सहवास लाभला नाही. तळहातावरील फोडाप्रमाणे यशवंतरावांना जपणा-या मातेजवळ तिच्या अखेरच्या प्रसंगी आपल्याला राहता आले नाही शल्य त्यांना खूप बोचले. मातेच्या अस्थी घेऊन यशवंतराव अलाहाबादला 'गंगा-यमुना-सरस्वती' या त्रिवेणी संगमावर गेले. गंगेत अस्थी सोडताना भूतकाळाचा एकमेव धागा झट्दिशी तुटल्याची भावना यशवंतरावांच्या मनाला छेदून गेली. आठ-नऊ वर्षाचे असताना आईबरोबर बैलगाडीतून पंढरपूरला गेल्याच्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या. आईचे बोट धरुन विठ्ठलाच्या मंदिरात केलेला प्रवेश आठवला. विठ्ठलाच्या पायावर मस्तक ठेवल्याचे आठवू लागले. आयुष्यात कधी पंढरपूरला जाण्याचा योग येईल त्यावेळी आईचे धरलेले बोट आता मिळणार नाही या आठवणींनी यशवंतरावांचे मन गलबलून गेले.

१९६५ च्या युध्दात भारताने पाकिस्तानवर मिळविलेला पहिला विजय देशाने पाहिला. १९७१ च्या युध्दात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करुन त्याचे दोन तुकडे केले तेव्हा तर त्या यशावर प्रशस्तीची मोठी कमान उभी राहिल्याचेच देशाला दिसले. संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतरावांनी केलेले काम केवळ औपचारिक मार्गदर्शनाचे नव्हते. राम प्रधानांनी संपादित केलेली त्या काळातील यशवंतरावांची डायरी नुसती चाळली तरी शस्त्रबळाच्या वाढीपासून सेनेच्या प्रत्यक्ष हालचालींपर्यंत त्यांनी उचललेले निर्णायकी पाऊल नजरेत भरले. १९६५ च्या युध्दाच्यावेळी अखंड दिवसरात्र सेनेच्या प्रमुखांशी आघाडीवरील पथकांच्या नेत्यांशी, तोफखाना व हवाईदलाच्या प्रमुख सैनिकांशी व अधिका-यांशी सततचा संपर्क कसा राखला होता व त्यातून त्यांना केवढे मोलाचे मार्गदर्शन केले होते याची जाणीव होते. पश्चिम सीमेवर युद्ध सुरु असताना पूर्वीला तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात (बांग्लादेशात ) आघाडी न उघडण्याचा व सारी भारतीय सैन्यशक्ती पश्चिमेकडे एकवटण्याचा निर्णय सेनाप्रमुखाचा नव्हता, तर तो यशवंतरावांचाच होता. यानंतर जानेवारी १९६६ मध्ये भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे पंतप्रधान आयबखान यांच्यात रशियामध्ये 'ताश्कंद' येथे एक करार संपन्न झाला. रशियन पंतप्रधान कोसिजीन यांच्या पुढाकारातून हा करार झाला होता. या करारावेळी भारताचे संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. दुर्दैवाने 'ताश्कंद करार' झाला त्या रात्रीच लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले. पंडित नेहरुंच्या निधनानंतर अवघ्या दोनच वर्षात भारताच्या दुस-या पंतप्रधानांच निधन झाल्याने भारताच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. याप्रसंगी तरुण, तडफदार नेतृत्व उदयास आले. पंडित नेहरुंच्या कन्या इंदिराजी गांधी यांची देशाच्या तिस-या पंतप्रधान म्हणून एकमताने निवड करण्यात आली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून एकमताने निवड करण्यात आली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मानही इंदिराजींना मिळाला. देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मंत्रीमंडळात काही फेरबदल केले. त्यानुसार यशवंतरावांवर देशाच्या गृहमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. गृहमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पहिल्या सहा महिन्यातच नव्याने १० राज्यपालांची नियुक्ती केली गेली. देशाची अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्यात ते यशस्वी ठरले.

जून १९७० मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. देशाची आर्थिक घडी पुढील चार वर्षात बसविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवायांनी संघटित स्वरुप घेतले, तेव्हा देशाने यशवंतरावांची नियुक्ती ऑक्टोब १९७४ मध्ये परराष्ट्र खात्याच्या मंत्रीपदावर केली. देशाचे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील विविध देशांना भेटी देऊन भारताला जगभरात मान-सन्मान मिळवून देण्यात यशवंतरावांचे योगदान खूपच महत्त्वपूर्ण ठरले.