आमचे मुख्यमंत्री -१२

श्री. बाळासाहेब व राजकीय चळवळ

श्री. बाळासाहेब खेर गांधीजींचे अनुयायी झाले. त्यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता(१९३१). ते मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष होते (१९३१). १९३१ साली तिस-या गोलमेज परिषदेवरून परत आल्यानंतर गांधीजींना अटक झाली. त्यावेळी खेरांनाही अटक झाली. बार्डोलीच्या शेतक-यांच्या प्रश्नाची चौकशी करण्याकरता नेमलेल्या समितीचे श्री. बाळासाहेब खेर सेक्रेटरी होते. श्री. बाळासाहेब खेर राजकीय चळवळीत जसे कृतिशील होते तसेच विधायक कार्यातही. त्यांचा खरा पिंड विधायक कार्यकर्त्याचा होता.

श्री. बाळासाहेब सोशल सर्व्हिस लीग, श्रध्दानंद महिलाश्रम, अस्पृश्यता निवारण, हरिजन सेवा संघ ह्या क्षेत्रातील कार्याशी निगडित होते. अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भात त्यांचे खेरवाडीतील कार्य स्मरणीय आहे. खेरवाडीस पूर्वी चामडेवाला की वाडी म्हणत असत. तेथे प्रामुख्याने चांभाराची वस्ती होती. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात (मुख्यमंत्री) त्यांनी बांद्रा स्टेशन ते टॅनर्स कॉलनीपर्यंत रस्ता करून घेतला. चांभारांना तांत्रिक शिक्षण देण्याकरता टॅनिंग व लेदर वर्क्स इन्सिट्यूट ही संस्था सुरू केली. चामडेवाला की वाडी हे नाव बदलून तिचे नाव लोकांनीच खेरवाडी असे केले. त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पुतळा उभा केला आहे.

आधाररहित महिलांच्या विषयी त्यांना असलेल्या आत्यंतिक सहानुभूतीमुळे त्यांनी माटुंगा येथील श्रध्दानंद महिला आश्रमाला भरपूर मदत केली.

श्री. बाळासाहेब खेरांना कायदा ह्या विषयात रस होता. ते हिंदू लॉ जर्नलचे संपादक होते हिंदु कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी न्यायालयातील द्विदल पध्दतीविरुध्द (बॅरिस्टर-सॉलिसिटर) आवाज उठवला.

कायदेमंडळात प्रवेश व मुख्यमंत्रिपद

श्री. बाळासाहेब खेर हे अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. त्यांना शिक्षण ह्या विषयाची आवड होती. त्यांच्या सौजन्यशील व नम्र स्वभावामुळे ते एका अर्थाने अजातशत्रू होते. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत उच्च दर्जाची होती. त्याचबरोबर कायदा व समाजसेवा ह्या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचे कार्य प्रशंसनीय होते. त्यामुळे श्री. नरिमनांना बाजूला सारून जरी श्री. बाळासाहेब ह्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तरी सर्वांनी त्यांच्या नेमणुकीचे स्वागतच केले. श्री. बाळासाहेब खेर हे दोनदा मुख्यमंत्री (मुख्यप्रधान) झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ साली मुख्यमंत्री झाले व ते फक्त दोन वर्षें त्या पदावर होते. १९४६ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले व १९५२ साली त्यांनी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे ठरविले. अर्थात बाळासाहेब हे त्रिभाषिक मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते. मुंबई, गुजरात व कर्नाटक हे मुंबई इलाख्याचा भाग होते. काही काळ सिंधही मुंबईस संलग्न होता. श्री. बाळासाहेब खेरांच्या नंतर श्री. मनोहर जोशींशिवाय कोणीही ब्राह्मण मुख्यमंत्री झाला नाही व दोघे सोडून कोणीही मुंबईची व्यक्ती मुख्यमंत्री झालेली नाही. बाळासाहेबांसारखा उच्चशिक्षित विद्वान असा मुख्यमंत्री विरळाच.