व्याख्यानमाला-१९७८-८

पण दुर्दैव असे की स्पृश्यजमातीतील फारच थोडे बाबासाहेबांना समजू शकले. जात ही विचित्र गोष्ट आहे. विनोदाने म्हणायचे तर जी कुणाच्याच डोक्यांतून जात नाही ती 'जात' स्वातंत्र्य मिळून तीस वर्षे लोटली तरी अजून नेमणुका, निवडणुका 'जाती'च्या आधारेच जिंकल्या जातात. जातीचा अंमल समाजाच्या सर्व क्षेत्रात दिवसेंदिवस वाढतोच आहे. जातीजातीतील उच्चनीचभाव समाजमनात इतका खोलवर रुजला आहे की या जातीच्या हरळीचे मूळ नष्ठ करण्यासाठी प्रभावी विचारांचे ट्रॅक्टर्सच हवेत. बाबासाहेब म्हणाले होते की या भारत देशात जात हा एक हिंस्त्र, विराट राक्षस आहे. कोणत्याही वाटेने जा तो राक्षस तुम्हाला अडवणारच. जातीचा राक्षस ज्या दिवशी मरेल त्या दिवशी नव्या भारताचा जन्म होईल. बाबासाहेब म्हणत की हिंदूसमाज हा एक मनोरा आहे. एक एक जात म्हणजे एक मजला होय, य मनो-यास शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात त्यांनी जन्मावे, त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातील इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो किती नालायक असो, त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कुणाची प्राज्ञा नाही. अशा जातीजातींनी बांधलेल्या हिंदुसमाजाला जाग आणण्यासाठी त्यांनी महाडच्या चवदार तळ्याच्या धर्मसंगरानंतर 'मनुस्मृती' चे दहन केले. मनूचे तत्त्वज्ञान विषमतेला खतपाणी घालणार होते म्हणून मनुस्मृतीच्या दहनाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी विषमतेला, भेंदाला पोसणारी समाजव्यवस्थाच नाकारली. ज्या मनुस्मृतीची पकड सर्व हिंदुधर्मीयांच्या मनावर कायमची घट्ट बसलेली आहे जिला पवित्रग्रथ म्हणून मानले जाते तिचे दहन कशासाठी ? तर ती अस्पृश्यांना 'माणूस' पण नाकारते म्हणून २९ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृतीचे दहन झाले ते प्रतिकात्म होते या दहनाने अस्पृश्यांच्या मनाला नवी शक्ती मिळाली. पन्नास वर्षांपूर्वी मनुस्पृतीचे दहन ही एक क्रांतीकारक घटना होती. प्रस्थापित सनातनी प्रवृत्तींना यामुळे हादरा बसला व त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. प्रतिगामी शक्तींना आव्हान दिल्याशिवाय, आक्रमक व लढाऊ पवित्रा घेतल्याशिवाय क्रांतीचे पाऊल पुढे पडत नाही. यामुळे क्रांतीचा विचार तळागाळापर्यंत पोचायला मदत होते. प्रस्थापित प्रवृत्ती चिडून उठतात, क्रांतीला चिरडून टाकण्यासाठी सगळे बळ एकवटतात. दहशतीचे, भीतीचे वातावर निर्माण करतात पण आंबेडकरांचे म्हणणे होते की निर्भयपणे आपला लढा चालू ठेवला पाहिजे. जो अन्याय करतो त्याचे हात थकतात आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याची प्रत्येक अन्यायाबरोबर ताकद वाढत जाते. आणि एक दिवस जुलुमी सत्ता, प्रवृत्ती कोसळतात. म्हणून धीर न सोडता ध्येयासाठी, मूल्यांसाठी लढले पाहिजे.

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन या दोन घटनांनी आंबेडकरांनी सवर्ण हिंदू समाजाची झोप उडविली. त्या मागोमाग नाशिक येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरु केला. या वेगवेगळ्या 'सत्याग्रहा'तून ते सवर्णांना विचारीत होते की शेकडो वर्षे ज्या सवर्ण हिंदूंनी आम्हाला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले तेच हिंदू आम्हाला माणुसकीचे हक्क देणार आहेत का? देशाच्या कानाकोप-यातून 'अस्पृश्य'या मुक्तिलढ्यात सामील होऊ लागले. अस्पृश्यांच्या अंत:करणात स्वाभिमानाची ज्योत पेटविण्याचे काम त्यांनी केले या छोट्यामोठ्या 'सत्याग्रहा' बरोबरच राजकीय हक्काचा लढा त्यांनी चालू केला. सायमन कमिशनच्या आगमनामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला. त्यावर एक उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने पहिली भारतीय गोलमेज परिषद लंडन येथे बोलविल (१९३०) काँग्रेसने यावर बहिष्कार टाकला. भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांनी आपल्या दलित बांधवांच्या राजकीय हक्काची कैफियत मांडली ते म्हणाले की अस्पृश्यता नष्ट करुन नागरिकत्वाचा समान दर्जा प्रस्थापित करण्यासाठी मूलभूत हक्क द्यावेत व त्यांचा निर्वेध उपयोग करता यावा. अस्पृश्यता मानणा-यांना कडक शासन करावे. सामाजिक बहिष्काराचा अवलंब करुन वागणा-यांना शिक्षा द्याव्या. स्पृश्य आणि अस्पृश्य यांना समान संधी, समान न्याय द्यावा आणि अस्पृश्यांना कायदेमंडळात, सरकारी नोक-यात पुरेशा जागा द्याव्या.