व्याख्यानमाला-१९७८-४

बाबासाहेबांचा विचार मरण पावणार नाही. त्या विचाराने अनेक मने पेटविली आहेत अनेक मने भारून टाकली आहेत. कारण त्या विचारात चैतन्य आहे. आमच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब सांगत की अन्याय झाला तर त्याच्यासमोर नम्र होऊ नका. सत्यासमोर ज्ञानासमोर कर्तृत्वासमोर नम्र व्हा. अन्याय करणारी व्यक्ती कितीही मोठी असो, अन्याय करणारा समाज कितीही शक्तिमान असो त्याच्याविरुद्ध व्यक्तिने, समाजाने झुंज दिली पाहिजे आंबेडकरांचा विचारच सांगतो की व्यक्तिपेक्षा विचार मोठा. स्वामी विवेकानंद म्हणत की व्यक्तीसाठी जगू नका तत्वासाठी जगा. समाजात तत्वनिष्ठ माणसं थोडी असतात बाकी सगळे तडजोडवादी, लाचार ! बाबासाहेब तत्वनिष्ठ होते. आपल्या तत्वापायी त्यांनी हवी ती किंमत दिली. व्यक्तिपूजा वा विभूतिपूजा राजकारणातील विवेकवादाला घातक असते असे ते मानत. ज्या समाजात व्यक्तिपूजा चालते तो समाज दुबळा असतो. या देशात मोठमोठ्या विभूती जन्माला आल्या आणि काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावल्या. या विभूतींनी मानवाच्या चिरंतन सुखासाठी तत्त्वज्ञान मांडले पण या विभूतींच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन, मनन करण्याऐवजी त्यांच्या चाहत्यांनी, भक्तांनी त्यांचे पुतळे उभे केले, मंदिरे निर्माण केली आणि त्यांच्या बाह्यगोष्टीचे अनुकरण केले. प्राध्यापक माटे म्हणाले होते की गुरुभक्ती ही महान व्याधी आहे. इतिहासाची साक्ष अशी आहे की गुरुच्या विचाराचा पराभव त्याचे शिष्यच सहज करु शकतात. रामदासांनी प्रपंचविज्ञान मांडले आणि समर्तपणे नेटका प्रपंच करण्याचे आवाहन केले पण त्यांच्या पारमार्थिक शिष्यांनी रामदासांच्या तत्त्वज्ञानाचा पराभव केला. एकोणिसाव्या शतकात ज्योतिरावांनी मानवधर्माची ध्वजा फडकाविली. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा ते सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे मानणा-या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या वर्णव्यवस्थेने व जातिव्यवस्थेने माणसामाणसात भेद निर्माण केला आहे. या सामाजिक विषमतेविरुद्ध महात्मा ज्योतिबांनी बंड पुकारले. मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी ज्योतिबांनी आवेशाने सांगितली ज्योतिबा हे भारतातील लोकशाही क्रांतीचे अग्रदूत होते. हाती येईल त्या शस्त्राने 'ब्राह्मणशाही' चा नायनाट करण्याचे धोरण फुल्यांनी अवलंबिले त्यांच्या विचाराचा आश्य व्यापक भूतदया हा होता. त्यांची सत्यशोधक चळवळ म्हणजे सामाजिक विषमतेविरुद्ध उठविलेला आवाज होता. सामाजिक विषमता हरप्रयत्ने नष्ट करावी, देव आणि भक्त यांच्यातील दलालाला मूठमाती द्यावी, शिक्षण सर्व थरात पसरावे, इंग्रजांशी सलोखा करुन सरकारी यंत्रणा काबीज करावी असा चतुर्विध कार्यक्रम त्यांच्या चळवळीचा होता. पण कालांतराने सत्यशोधक चळवळ सत्ताशोधक बनली. या चळवळीमागच्या उदात्त प्रेरणा मागे पडल्या. मानवी ऐक्य हे एकच सत्य आहे असा उज्वल संदेश देणा-या महात्म्याचा पराभव त्यांच्या तथाकथित अनुयायांनी केला. जोतिराव फुल्यांचे नाव सांगून संकुचित दृष्टी बाळगणा-या अनुयायांना १९५० मध्ये डॉ. बाबासाहेबांनी चांगलेच खडसावले ते म्हणतात," ब्राह्मणेत्तर वर्गाने जोतिबा फुले यांची स्मृती सर्वस्वी पुरुन टाकली आहे. या वर्गाने निर्लज्जपणे फुले यांचा विश्वासघात केला आहे" महात्मा फुल्यांचे जीवन म्हणजे अखंड युद्ध होते.१८५१ त मुलींची शाळा, १८५२ त अस्पृश्यांची शाळा, १८६४ त बालहत्याप्रतिबंधक गृह अशा एकामागोमाग ज्या कृती केल्या त्यामुळे सुधारणेच्या प्रक्रियेला विलक्षण गती दिली. त्यांनी वंचित विधवांना आश्रय दिला.घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला केला. सारस्वत ब्राह्मण जातीत १८६४ साली पहिला पुनर्विवाह घडवून आणण्याचे श्रेय त्यांचेच. सत्याचा व पतितांचा पालनवाला अशा जोतिरावांनी आपली तत्वे व विचार समाजाच्या खालच्या थरापर्यंत नेऊन पोचविला. जोतिरावांचे कार्य व विचार ही डॉ. आंबेडकरांच्या जीविताची एक महत्त्वाची प्रेरणा होती. चातुर्वर्ण्य व जातिभेद यावर कडाडून हल्ला चढवून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्त्व व समता या मूल्यांना प्रतिष्ठित करणा-या जोतिरावांना डॉ. आंबेडकर यांनी कबीर व बुद्ध यांच्या बरोबर स्थान दिले होते ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. जोतिबा डॉ. बाबासाहेब इ. व्यक्ती अहोरात्र आपल्या अंगीकृत कार्याचे चिंतन करीत असतात तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आमुची ती कळवळयाची जाती, करी लाभाविण प्रीती.