विविधांगी व्यक्तिमत्व-९७

कवी सुधांशु, अनिल, मंगेश पाडगावकर, राजा बढे, दिलीप चित्रे, बा. भ. बोरकर, नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, वसंत बापट, पु. शि. रेगे, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, फ. मुं. शिंदे, आदी जुन्या - नव्या लेखकांचे काव्यसंग्रहही आहेत. भालचंद्र नेमाडे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, प्रभाकर पाध्ये, अनंतर काणेकर, गोविंद तळवलकर, द्वा. भ. कर्णिक, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे, शांता शेळके, डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. नरहर कुरुंदकर, विद्याधर पुंडलिक, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, मालतीबाई बेडेकर, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, डॉ. आनंद यादव, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या साहित्यनिर्मितीची दाद यशवंतरावांच्या अभिरुचीत घेतलेली दिसते. अशा प्रकारे कितीतरी विषयांवरील पुस्तके त्यात आहेत. यशवंतराव नुसते ग्रंथवेडे नव्हते., त्यांची वाचनाची, अभ्यासाची दालने किती विस्तृत होती आणि त्यांची अभ्यासाची किंवा पुस्तके वाचण्याची पद्धती किती अर्थपूर्ण होती, याचे यथार्थ दर्शन या ग्रंथसंग्रहावरून होते.

आज सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक ट्रस्टमध्ये खालील सन्माननीय व्यक्ती विश्वस्त म्हणून काम पाहतात.

(१) मा. शरदराव पवार, मुंबई (अध्यक्ष), (२) ना. एन्. के. पी. साळवे, (दिल्ली), (३) मा. कल्लाप्पाण्णा आवाडे, इचलकरंजी, (४) मा. विनायकराव पाटील, नाशिक, (५) मा. अशोकराव चव्हाण, मुंबई, (६) मा. पी. डी. पाटील, कर्‍हाड,(७) मा. शामराव ग. पवार, कर्‍हाड (८) मा. विक्रमसिंह पाटणकर, पाटण.

साहेबांच्या ग्रंथालयात स्वत: त्यांनी खरेदी केलेले व त्यांना भेट म्हणून येत असलेले ग्रंथ जमा होत राहिले. त्यावेळी त्या ग्रंथ साहित्याची व्यवस्थितरीत्या जपणूक हे एक महत्त्वाचे काम होते. त्या कामाची जोखीम सौ. वेणूताईनी स्वीकारून दर आठ-पंधरा दिवसांनी ती पुस्तके कापाटातून बाहेर काढावयाची, स्वच्छ करावयाची, वाळवी व किटकांपासून संरक्षण व्हावे म्हणून कीटकनाशकाची फवारणी करावयाची आणि पुन्हा ती विषयवार लावून ठेवायची हे काम त्यांनी अव्याहतपणे केले. त्यामुळे हा ग्रंथसंग्रह आजअखेर व्यवस्थित व नीटनेटका राहिला. त्यांच्या या कार्याचं मोल फार मोठं आहे.

वेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या योग्य अशा स्मारकासाठी कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमाच्या ठिकाणी म्हणजे कर्‍हाड येथे. 'सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ची स्थापना स्वत: यशवंतरावांनी करून त्यात संग्रहित केलेल्या ग्रंथसंग्रहानं व वस्तुसंग्रहानं संपन्न बनलेली आहे. आणि हे ज्ञानभंडार आता आजच्या आणि उद्याच्या पिढयांसाठी, अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी मुक्त केलं आहे. सर्वार्थानं विकसित झालेलं हे ज्ञानभांडार कर्‍हाडनगरीचं एक भूषण ठरलेलं आहे.

मा. यशवंतरावांच्या स्वप्नातील स्मारकाप्रमाणे सौ. वेणूताई चव्हाण स्मारक भवनाच्या पहिल्या मजल्यावर सांस्कृतिक सभागृह उभारावे व सर्व सोईनी संपन्न असे ते सभागृह व्हावे की, ज्याचा उपयोग विविध सांस्कृतिक उपक्रमासाठी करता येईल अशी त्यांची तीव्र इच्छा, पण दैव दुर्विलासाने हे स्वप्न पुरे होण्या अगोदरच मा. यशवंतरावांचे निधन झाले. पण साहेबांची ही इच्छा परिपूर्ण करण्यासाठी साहेबांचेच मानसपुत्र व या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. शरदराव पवार व विश्वस्त मंडळीनी इ. स.२००० मध्ये अद्यावत सभागृह उभारण्याचे साहेबांचे स्वप्न साकार करण्याचे ठरविले. आणि त्या ध्यासाने प्रेरीत होऊन फार मोठ्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था करून सौ. वेणूताई चव्हाण स्मारक भवनाच्या पहिल्या मजल्यावरील ‘सांस्कृतिक सभागृह’ पूर्णत्वास नेण्यास मा. शरदराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना त्यांच्या सहकार्याविना सांस्कृतिक सभागृहाची उभारणी होऊच शकली नसती. म्हणून मा. शरदरावांची त्यांच्या बद्दलची कृतज्ञता शब्दात व्यक्त करता येणार नाही.