यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :१०५

विवेक व विवेकवंत

“ब्रह्म व माया” यांच्या विचारप्रपंचात मागील आचार्य, संत व कवी गुंतून गेलेले होते. अविद्या म्हणजे माया नव्हे, अविद्या म्हणजे शिक्षण नसणे. अविद्या म्हणजे निरक्षरता असा क्रांतिकारण विवेक म. फुले यांनी प्रथमच नव्या काळानुसार केला. नेत्याला-पुढा-याला अद्ययावतताही पाहिजे. केवळ भूतकाळात राहून पूर्वजांचा व स्वसंस्कृतीचा बिनहिशेबी गौरव करीत राहणे फारच अपुरे ठरते. क्रांतिकारक विचार फारच थोडे मांडू शकतात. पूर्वी पंडित, शास्त्री वगैरेनी शुष्क वादविवादात फारच काळ घालविला. धर्मांतरे होत आहेत. व शुद्धीची गरज आहे व होती. हेही त्याच्या लक्षात (द्यानंद येईपर्यंत) आले नाही. यामुळे पंचमस्तंभी लोकांची देशात अमाप वाढ झाली आहे. देश चोहोबाजूंनी संकटात आहे.

ज्यांना बुद्धीसामर्थ्य आहे, अशा विवेकवंतांनी बुद्धिभेद करून केवळ विघटन करू नये. धूर्तता व कपट बुद्धीवंत समाजाने टाळले पाहिजे व इतर सर्वसामान्य बहुजनांचा विश्वास संपादून त्यांना ज्ञानी केले पाहिजे. केवळ त्यांच्या अज्ञानाचा व अंधश्रद्धेचा फायदाच घेत राहू नये. हा सर्व विचारप्रपंच यासाठी की पुढारी व विवेकवंतात ‘फाळणी’ नसावी. पुढारी मंडळी विषयी घृणा नसावी. शासन यंत्रणा व पुढारी यांचे साहचर्य हवे आहे. सचिव व मंत्री यांचे सहकार्य हवे आहे.

पुढारी मंडळीला लोकांचे ज्ञान असते व ही मंडळी व्यवहारी देखील असतात व करण्यास जरूर असते ते करूही शकतात. कारण त्यांच्याजवळ मनुष्यबळ असते. विवेकवंतांनी केवळ एकाकी जगू नये, समाजात मिसळावे, बहुसमाज जनांच्या सुख दु:खाशी एकरूप व्हावे.

आत्मपरीक्षण या दोन्हीही वर्गाला हवे आहे व ज्या उणिवा दोघात आहेत, त्या दूर केल्या तर स्वातंत्र्याचे सुराज्य देखील होईल.

“सामाजिक विषमता कायम राहिली तर कोणतीही राजकीय रचना वा आर्थिक रचना टिकणार नाही. कधीतरी त्या विषमतेतून असंतोष निर्माण होईल आणि त्या असंतोषाचा स्फोट होऊन ती रचना उडविली जाईल. म्हणून सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यांची काळजीपूर्वक जोपासना या देशाला करावी लागणार आहे. पुरोगामी सामाजिक विचारांची परंपरा असणा-या महाराष्ट्राला आता ते पुरोगामी विचार राष्ट्रीय जीवनात आणले पाहिजेत. महाराष्ट्राने समाज सुधारणेची आपली परंपरा जागृत ठेवली पाहिजे.”

यशवंतराव चव्हाण