यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :१०२

विवेकवंत म्हणजे शहाणे विद्वान व जबाबदार नागरीक असा अर्थ होतो. परंतु विवेकवंतानी केवळ ज्ञानी असून यापुढे चालणार नाही, त्यांनी क्रियावंत असावे. शुष्कपणे क्रियाहीन असू नये. क्रियावान तोच पंडित. समाजापासून व राजकारणापासून दूर राहू नये. तुसडेपणा समाजाला फायद्याचा नसतो! तटस्थ विवेकवंत जास्ती अलग पडतो. विवेकवंतांची संख्या वाढली पाहिजे, पुढा-यांच्या संख्येपेक्षा विवेकवंत फारच थोडे आहेत व खरे विवेकवंत उत्तरोत्तर दुर्मिळ होत आहेत. पांढरी गांधी टोपी, नेहरू सदरा परिधान करण्याच्या प्रथेमुळे पुढारी उमटून दिसतात! दृश्य होतात. विवेकवंत समाजाच्या व पुढा-यांच्याही नजरेपासून अज्ञात असतात. ही उपेक्षा होय. पुढारी म्हणजे ज्याने त्याचे उखळ पांढरे करून घेतले आहे, अशी मंडळी असा अर्थ होऊ नये.

केवळ मध्यमवर्गातूनच विवेकवंत आढळतात. शेतकरी वर्ग, कामगार वर्ग वगैरे श्रमिकांतूनही विवेकवंत पुढे यावेत, त्यांनी सर्वांनी, श्रमिकांनी आपआपली सुखदु:खे साहित्यातून मांडावीत. भाषण, संवाद, परिसंवाद व लेखन ही विवेक प्रगट करण्याची साधने आहेत. ती वरील सर्वांच्या कह्यात, कक्षेत यावीत, असावीत. गरीबादेखील लोकशाहीत पुढारी-प्रतिनिधी होता यावे पण होता येत नाही. हे खरे! पुढारीपणाची व विवेकवंतपणाची मिराशी व वंशपरंपरागत (जातवर्णवादी स्वरूप व अवस्था) असू नये. कारण लोकशाही ही सर्वांना संधी देणारी पद्धती आहे, जे खरे पुढारीपण मिळवू इच्छितात व जे जे खरे विवेकवंत असू शकतात ते भूषणावह ठरतात. पुढारी निराळे व विवेकवंत निराळे वेगळे असा येथे पृथक विचार करण्याचे प्रयोजन पडले, ते पडू नये. दरी दोघांत नसावी कारण मनुष्यमात्राला ‘विवेक’ जरूरीचा असतो. नित्यानित्यविचार करणे, यालाही परमार्थात विवेक म्हणतात. पण सर्वप्रकारच्या जीवनाच्या अंगोपांगात विवेकी विचारांची सर्वांना गरज असतेच. पुढा-यांनी विवेकवंतांचा सल्ला घ्यावा. कै. यशवंतरावांची ही प्रथा होती पण त्यांच्यासारखे पुढारीदेखील दिसत नाहीत.

पुढारी होण्याचे ‘ध्येय’ आपल्या मुला-बाळांना, सग्यासोय-यांना सुबत्ता व गडगंज श्रीमंती आणून देण्याचा मार्ग असा अर्थ होऊ नये. राजकारण करून पुढारी चटकन त्यांची ‘गरीबी’ हटवतात. पण सर्वसाधारण लोकांची गरीबी वाढतच आहे. पुढारी (पुरोहित, उपाध्याय) म्हणजे एक दलाल, मध्यस्थ, एजंट असा अर्थ होणे, हा हानिकारक मार्ग होय. पुढारी हा शब्द (परिभाषा) राजकारणातील आहे. पुरोहित, उपाध्याय, भिक्कू व भिक्षुक, पोप, पाद्री व मुल्ला मौलवी हे धार्मिक ‘पुढारी’ होत. नेत्याने, पुढारी म्हणविणा-यांनी स्वत:चे चारित्र्य चांगले ठेवून लोकहित साधून दिले पाहिजे. पुढा-याने अनुयायासाठी जीवन समर्पिले पाहिजे. केवळ स्वत:साठी, परिवारासाठी जगता कामा नये. पुढारी म्हणजे स्वत: पुढारलेला व लोकांना पुढे नेणारा, असा वास्तविक अर्थ आहे. मूल्यर्थ हा होय. विवेकवंतालादेखील सामाजिक बांधिलकी असलीच पाहिजे. तथापि ग्रामीण भागातील जे प्रतिनिधी होतात त्यांच्यावर जबाबदारी मोठी असते. ज्यांना ‘पुढारी’ म्हणून संबोधिले जाते व जे पुढारीपण करतात, त्यांनी स्वत:चे त्यांचे कर्तव्य व जबाबदारी जाणावी हे बरे नव्हे काय? कार्यकर्ता पुढारी होतो.