आमचे मुख्यमंत्री -९३

वसंतदादा पाटील चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी विनाअनुदान तत्वावर शिक्षणसंस्था स्थापण्यास उत्तेजन दिले. त्यामुळे त्यांच्या मतदार संघातही अशी विद्यापीठे स्थापन झाली. दादा सांगली भागातील विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. लठ्ठे शिक्षण संस्थेचे महाविद्यालय स्थापण्यात व मिरज येथील मेडिकल महाविद्यालयाचा विस्तार करण्यास त्यांनी मदत केली.

शरद पवारही चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी बारामतीस जे प्रकल्प उभारले आहेत ते पवार बंधूंच्या आणि पवार कुटुंबियांच्या श्रमांचे फलित. त्यांनी आपल्या मतदार संघात दुधाच्या धंद्याला विकासाला उत्तेजन दिले. त्याकरता सहकारी संस्था स्थापण्यास मदत केली. कृषिपूरक उद्योग व फलोद्योग ह्यांच्या वाढीसाठीही साहाय्य केले. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या विकासात भाग घेऊन तेथील लोकांना शिक्षण घेण्यास संधी उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला.

अंतुले ह्यांनी छोट्या बंदरांच्या विकासाकरता खूप प्रयत्न केले. त्यांनी ब-याच गोष्टी करण्याची आश्वासने दिली हेती, पण त्यांची पूर्तता ते करू शकले नाहीत. कारण त्यांना मुख्यमंत्रिपदच लवकर गमवावे लागले. तरीसुध्दा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन, कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामांतर, आणि दाभोळसह कोकणातील चार लघु बंदरांच्या विकासाला मंजुरी ह्या गोष्टी त्यांनी आपल्या मतदारसंघात केल्या.

बाबासाहेब भोसले हे नेहरूनगर मतदार संघातून विधानसभेत निवडून आलेले. महसूल न्यायमंडळाचे ते सदस्य असताना ते हाजी अली येथील शासकीय वसतिस्थानात राहत होते. त्या ठिकाणी त्यांनी एक हॉल बांधून दिला व त्या ठिकाणी कल्याण समितीची स्थापना केली. नेहरूनगर विभागाकरता रेल्वे अंडरब्रीज बांधून घेतला. त्यामुळे नेहरूनगर व चुनाभट्टी जोडले गेले. कुर्ल्यास एस.टी. डेपो स्थापन केला. त्या ठिकाणी स्वतंत्र रेशनिंग ऑफिसची सोय केली. स्वतंत्र पोलिस स्टेशनही उभे केले आणि ट्रफिक सिग्नल बांधून घेतला.

शिवाजीराव निलंगेकर पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठवाडा विकासाचा एक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु त्यांची कारकीर्द अत्यल्प ठरली.

सुधाकरराव नाईकांचा पुसद हाच मतदारसंघ. त्यांना मुख्यमंत्रिपद अल्पकाळ लाभले. त्यांनी आपल्या मतदार संघात सुताच्या गिरण्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले. त्यांनी स्वतः पत्रकारीता केलेली असल्यामुळे पत्रकारांना शिक्षण देण्याकरता त्यांनी यवतमाळ येथे एक ट्रस्ट स्थापन केला. संत तुकडोजी महाराजांचे वाडमय छापण्यात पुढाकार घेतला आणि महात्मा गांधी यांचे चरित्र अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना आखली.