व्याख्यानमाला१९७३-२५

सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वीच सुर्याभोवती फिरत आहे असे सिध्द केल्याबद्दल गॅलिलिओला पोपकडून विलक्षण छळ सहन करावा लागला. ब्रूनोला तर जिवंत जाळण्यात आले. हे जे विज्ञानोपासक होते हे ख-या अर्थाने धार्मिक होते. Discovery of  India  या ग्रंथात नेहरूनी म्हटले आहे, ‘आधुनिक जगात सारा जन्म प्रयोगशाळेत स्वत्:ला डांबून घेऊन सबंध मनुष्य जातीच्या सुखासाठी आयुष्य वेचणारे शास्त्रज्ञच खरे धर्मनिष्ठ होत, मला हे पटते. जर यंत्रयुग आले नसते तर, समतेचा विचारच आपण करू शकलो नसतो प्रत्येक माणसाला किमान जीवनमान मिळवून देण्याची प्रतिज्ञा करणे पाचशे वर्षापूर्वि शक्य नव्हते. विज्ञानाचीच ती किमया आहे. विसरून विज्ञानामुळे मानवी जीवनातील स्पर्धा संघर्ष आणि दु:खे वाढली आहेत असे आपण म्हणतो, आणि जुन्याचे गोडवे गातो. विज्ञानासाठी, समाजपरिवर्तनासाठी आपण काही किंमत दिलेली नाही. म्हणूनच त्या निष्ठा आपल्या अंत:करणात रूजल्या नाहीत. भौतिक परिस्थितीही याला कारणीभूत आहे हे खरे आजच्या युगात जीवनाला विलक्षण गती मिळालेली आहे पण त्याचबरोबर व्यक्ती अगतिक बनलेली आहे. शासन तिच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. व्यक्तीचे सामर्थ्य व आत्मविशवास व्यावसायिक संघटनांचा येथे अभावच आहे. त्यामुळे पूर्वसंस्कारामुळे प्रत्येक माणुस जातीकडे धाव घेतो. जातीतील चार श्रीमंत लोक गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाला मदत करतात. अनाथांना आधार देतात म्हणून कामगार संघटना सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा व्यक्तीला आधार देण्यासाठी तिच्या पाठीशी उभ्या राहिल्याशिवाय जातिनिष्ठेला ओहोटी लागणार नाही. आज मुंबईमध्ये प्रत्येक जातीच्या  वेगवेगळ्या संस्था आपणास आढळून येतात. त्या  आपापल्या जातीमधील गरिबांना मदत करतात. पण निरनिराळ्या जातीमधील विषमता त्यांच्या कार्यामधून कमी होत नाही. शाहरांत व्यावसायिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जेथे स्वतंत्र संघटना उभ्या आहेत. तेथे जातीयतेची धार थोडीफार कमी कमी झाली आहे असे दिसून येते. कोणत्याही जातीचा मनुष्य तेथे निवडून येऊ शकतो. खेड्यातील जातीयता मात्र अद्याप कायम आहे.
    
हमीद दलवाई आपल्या लोकांचा रोष पत्करूनही मुसलमानांमध्ये ऐहिकनिष्ठ विचारसरणीचा प्रचार करीत आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या धर्तीवर त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली आहे. त्यासाठी त्यांना मारही खावा लागला. मुसलमाम समाजात ते नवे प्रबोधन घडवून आणित आहेत. मुसलमानांनी राष्ट्रध्वजाला मान दिला पाहिजे असे ते मुसलमान लोकाना सांगत आहेत, मुसलमान समाजातून ऐहिकनिष्ठ राष्ट्रवादी दृष्टिकोन मांडणारे काही थोडे निघाले, तरी ती अत्यंत स्वागतार्हू घटना आहे. हिंदुमध्येही संकुचितपणा कमी नाही. आगरकरांची आपण प्रेतयात्रा काढली. फुले पतिपत्नीचा छळ केला. आंबेडकरांची तर पुष्कळच मानहानी झाली. तेव्हा हिंदूसारे उदारमतवादी आहेत असे मानण्याचे काही कारण नाही. पण बुध्दिनिष्ठ ऐहिकवादी विचारसरणीचा पाठपुरावा करणारे काही थोडे महाभाग आपल्यामध्ये निघाले. मुसलमान समाजामध्ये नव्या मुल्यांचे संस्कार घडवून आणण्याचे काम अद्याप व्हावयाचे आहे. त्यांच्यातील सुशिक्षित तरूणांनाच ते करावे लागेल. पण त्यांना पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे.

समाज परिवर्तनाच्या  कार्यात राजकीय पक्षांचा कार्यभाग फार मोठा आहे. सत्ताधारी पक्ष क्रांतिकारक भूमिका घेईल अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल, याचा अर्थ त्यांने काही केले तरी चालेल असा नाही. त्याच्यावर कठोर टीका झाली; लोकमताचा दबाव आणलागेला तरच तो एखादे दुसरे पाऊल पुढे टाकील. मात्र क्रांतीचा विडा उचलणा-या पक्षांनी अधिक तत्वनिष्ठ भूमिका घेतली पाहिजे. नाहीतरी विधीमंडळात डाव्या पक्षांची हाताच्या बोटांवर इतकीच माणसे निवडुन येतात. मग संधिसाधुपणाच्या या युत्यातरी कशासाठी ? निदान तत्वनिष्ठेचे सामर्थ्य़ तरी दाखवा. निवडमणूकीत तडजोड करून बहूमत मिळण्याचा संभव असेल, तर मी साधनशुचितेचा इतका आग्रहही धरणार नाही. निवडून आल्यावर आपल्या ध्येय धोरणानुसार सत्तेचा वापर करून दाखविता येईल. पण सत्ता तर अनेक योजने दूर आहे. मग निदान तत्त्वनिष्ठा तरी सांभाळावी. जोपर्यत वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित आहे तोपर्यत तुमची जरी दोन माणसे विधांनसभेत असली, तरी लोकजागृती करू शकतील. आजही पहा. विधांनसभेत विरोधी पक्षाची दोन चार माणसेच जरी बोलत असली, तरी सामान्यजनतेची सहानुभूति त्यांच्याकडे जाते. सत्ताधारी पक्ष बेजबाबदार असेल, तर त्याच्याबद्दल अप्रीती निर्माण होते. वृत्तपत्रे खुली नसली, तर मग इलाजच नाही. मग घटनात्मक चळवळच चालणार नाही. १९३७ साली मुंबई विधिमंडळात डांगे, आंबेडकर, जमनादास मेहता असे विरोधी पक्षाचे अगदी मोजके प्रमुख होते. पण ते अधिवेशने गाजवीत. तेव्हा केवळ दोनचार जागा वाढल्याने विरोधी पक्षांच्या सामर्थ्य़ात काही भर पडते असे नाही.