व्याख्यानमाला१९७३-२१

साधनसुचितेचा आग्रह धरणारा आणि विश्वशांतीसाठी आत्मार्पण करणारा हा माणूस जाऊन तीस वर्षे झाली नाहीत तोच सगळीकडे एवढा भ्रष्टाचार आहे. कोतेपणा तरी किती ! बारीक बारीक गट, जातीचे गट, गावाचे गट, प्रांताचे गट. फक्त परकीयांचे आक्रमण होते, तेव्हा या गटबाजीला थोडा आळा बसतो. चीनचे आक्रमण झाले, तेव्हा काही काळ सर्व एक झाले. पाकशी दोन युध्दे झाली त्यावेळी एकजूट दिसून आली. राष्ट्रीयत्वाची उर्मी देशभर उसळली. पक्षभेद क्षणभर बाजूला सारले गेले, पण किती वेळ ? जिवाला धोका होता देशाच्या जीवनमरण:चा  प्रश्न होता तोपर्यत. नवनिर्माणासाठी आम्ही एक दिलाने धडपडतो आहोत असे कुठे आढळत नाही. शांततेचा काळ आला, जरा उसंत मिळाली की झाली भांडणाला सुरवात. नुसते पक्षभेद नाहीत, नुसते वर्णभेद नाहीत, प्रांताप्रांतामध्ये एकमेकांचे शत्रु असल्यासारखी भांडणे होतात. जातीजातीत धर्माधर्मात भांडणे होतात. मग यांतून राष्ट्र कसे उभे राहणार ? यात कोणाला दोष देण्याचा उद्देश नाही. मात्र असे का होते हे आपण समजून घेतले पाहिजे. इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. नाहीतर तेल्याच्या घाण्याभोवती बैल जसा फिरत राहतो. तसेच आपण चक्रकार फिरत राहू. आपल्या राष्ट्रवादी चळवळीत हिंदू राष्ट्रवाद, मुस्लीम राष्ट्रवाद, बौध्दांचा राष्ट्रवाद असे निरनिराळे प्रवाह निर्माण झाले. यात दोष कुणाचा किती याचा खल करण्यात हशील नाही. पण ही स्थिती बदलली पाहिजे. या सर्व चळवळी सत्ता संधर्षाच्या संदर्भात उत्पन्न झाल्या. १९०६ साली म्हणजे मोर्ले-मिंटो सुधारणांना आकार येत असताना मुस्लीम लीगची स्थापना झाली. या सुधारणा कायद्याने मुसलमानांना स्वतत्र मतदारसंघ मिळाले. मला अ:ठवते की इंग्रजांच्या भेदनीतीचा भेदनीतीचा हा पहिला तडाखा आमच्या लहानशा जव्हार संस्थानात बसला. त्यावेळी सरकारने एक उर्दू शाळा काढलेली होती. पण एकही मुलगा  न आल्या मुळे ती बंद करावी लागली. गावात मुसलमानांची पन्नाससाठ घरे होती. त्यांची मुले मराठी शिकत. आमच्या शाळेत दोन तीन मुसलमान शिक्षक होते. ते आमच्यासारखे धोतर नेसायचे उत्तम मराठी बोलायचे, ते सणाला आमच्या घरी यायचे, आपले लोक त्यांच्याकडे जायतचे. व्दिराष्ट्रवादाला धार येईपर्यत हिंदु-मुसलमानांचा तंटा तेथे उपस्थित झाला नव्हता. पण आतामात्र पुढानपिढ्या सलोख्याने एकत्र नांदलेल्या लोकांत एकदम दुजाभाव निर्माण झाला आहे. १९१९ साली  मॉटेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा आल्या तेव्हा ब्राह्मणब्राह्मणेत्तर वादाला सुरवात झाली. गोलमेजपरिषदेनंतर अस्पृश्यांच्या चळवळीला उठाव मिळाला आणि स्वातंत्र्याप्राप्तीच्या सुमारास आदिवासी चळवळीचा उद्य झाला. समाजाच्या निरनिराळ्या थरात जसजशी जागृती झाली, तसतशी राजकीय सत्तेत व संपत्तीत भागीदारी मिळवण्याची आकांक्षा त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली. यात वास्तविक कांही वाईट नाही. स्वराज्य मिळवले, ते लोकांना नैसर्गिक हक्क मिळावे, त्यांचे जीवनमान सुधारावे म्हणूनच. मध्ययुगात देशातील बहुसंख्य लोंक राजकीय सत्तेबद्दल उदासीन होते. ‘ठेविले अनंतें तैसेचि राहावे’ अशा प्रकारच्या दैववादाच्या आहारी जाऊन पशुतुल्य जीवन ते जगत होते. आता लोक तसेच अल्पसंतुष्ट राहतील हे शक्य नाही. आपल्या देशात लोकशाही आहे, प्रौढ मताधिकार आहे. समाजवादी समाजरचनेच्या घोषणा आपण केलेल्या आहेत, त्यांमधून लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली तर ते स्वाभाविकच नाही का ? राष्ट्रीय नेत्यानी लोकांना दिलेली आश्वासने आणि त्यांची पूर्ताता यांच्या तफावतीतून आजचे तणाव निर्माण झाले आहेत. यांतून मार्ग काढावयाचा तर ध्येयनिष्ठा व व्यापकदृष्टी यांची आवश्यकता आहे.

आगरकर आणि फुले यांच्यासारख्या बुध्दिवादी विचारवंतांच्या या महाराष्ट्रामध्ये आज पुनरूज्जीवनवादी प्रवृत्ती डोकावत आहे. ख-या अध्यात्मवादाला माझा विरोध नाही. गांधी किंवा विनोबा यांचे अध्यात्म ही एक जीवन उजळुन टाकणारी प्रेरणा आहे. पण सारसबागेमध्ये दर्शनासाठी लांबच्या लांब रांग लागते आणि सुशिक्षितामध्ये नवससायास करण्याची प्रवृत्ती फैलावते ही आध्यात्मिक प्रेरणा नव्हे. तो निव्वळ धर्मभोळेपणा आहे. मुलगा आजारी पडला की एकाद्या उत्कृष्ट डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आणि वर एखाद्या बुवाचा अंगाराही लावायचा. डॉक्टर झाला तर ! ही मनांत शंका. त्यासाठी दैवी उपायांची तरतूद म्हणजेच बुडत्याला कार्डाचा आधार. हा भोळेपणा अडाणी लोकांत आहे असे नाही.