विरंगुळा - ७५

पाकिस्तानचे विचार आणि हेतू समजण्यासाठी भुत्तोचे शब्द आणि विचार आम्हाला मार्गदर्शक आणि उपयोगी ठरतील. प्रे. आयुबच्या Insincere शब्दावर अधिक भरवंसा ठेवता येणार नाही. चेअरमन कोसिजिन किती प्रमाणांत स्पष्ट भूमिका घेतील याच्यावर या बैठकीचे भविष्य आहे असे माझे मत आहे. पाहू या!
-यशवंतराव
-----------------------------------------------------------

कोसिजिन यांच्या मुत्सद्देगिरीच्या मध्यस्थीमुळे, तडजोडीच्या भूमिकेमुळे १० जानेवारीला, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या मुख्य प्रश्नासंबंधात अखेर सलोखा घडला. शांतता करारावर सह्या झाल्या. बैठक संपली. सलोखा आणि सह्या झाल्यानंतर शास्त्रीजींनी पाहुण्यांसमवेत खाना घेतला आणि विश्रांतीसाठी आपल्या दालनात गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीस येण्यासाठी निघायचे होते. देशाचं दुर्दैव असं की, त्याच रात्री शास्त्रीजींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मावळली. यशवंतराव शेजारच्या दालनात होते. हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच ते शास्त्रीजींच्या दालनाकडे धावले. डॉक्टरांचे उपचार सुरू झाले. शास्त्रीजींना यशवंतरावांनी आपल्या पोटाला टेकवून धरले होते. उपचार सुरू असतानाच शास्त्रीजींची मान कलली, यशवंतरावांनी दोन्ही हातांनी मान धरून ठेवली. पण प्राण निघून गेला! शास्त्रीजींच्या निष्प्राण देहाचेच दर्शन घ्यावे लागले. भारतातील जनतेला प्रचंड धक्का बसला.

शास्त्रीजींच्या पार्थिवासह यशवंतराव दिल्लीस परतले तेव्हा त्यावेळचे गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हंगामी स्वरूपात स्वीकारली होती. शपथविधीनंतर पंतप्रधानपदाच्या गादीचे आपणच आता खरे वारसदार आहोत अशी त्यांची भावना झाली. या उच्चपदासाठी मोरारजी देसाई डोळा ठेवून आहेत याची नंदा यांना कल्पना नसावी. पं. नेहरूंच्या निधनानंतर मोरारजींची संधी हुकली होती. आता आलेली संधी त्यांना घालवायची नव्हती. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. पंतप्रधान पदासाठी त्यावेळी मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या नावांची चर्चा सुरू राहिली. के. कामराज हे तेव्हा अ. भा. काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते मद्रासला असतांना शास्त्रीजींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांनी लगेच सहकाऱ्यांशी चर्चा आणि विचारविनिमय सुरू केला होता. यशवंतरावांची प्रतिमा त्या काळात खूपच उंचावली होती. पंतप्रधानपदाच्या संदर्भात निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करण्याचे कामराज यांनी योजिले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि आणखी काहीजण दिल्लीत ठाण मांडून बसले. यशवंतराव यांच्यासाठी इतरांचे सहाय्य उपलब्ध करण्यासाठी त्यांनी मनापासून तयारी सुरू केली.

दरम्यान यशवंतरावांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या चर्चा घडत राहिल्या. या चर्चेसाठी इंदिरा गांधी - सी. सुब्रह्मण्यम आणि अशोक मेहता रात्री साडेआठ वाजता यशवंतरावांच्या निवासस्थानी एकत्र बसून चर्चा करीत असत. पंतप्रधान पदासाठी नेत्याचे नाव जाहीर होण्याच्या दिवसापर्यंत चार दिवस ही चर्चा होत राहिली. यशवंतरावांना हे पद मिळावे यासाठी एकमत असल्याचे दर्शविले जात होते.