विरंगुळा - ६०

वस्तुत: यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे कट्टे पुरस्कर्ते. असं असूनही विशाल द्वैभाषिकाचं मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं. ते चालविण्याची जबाबदारी घेतली. हा काटेरी मुकुट डोक्यावर का ठेवून घेतला याचं उत्तर त्यांनी नंतरच्या काळात, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी चतुराईनं प्रयत्नशील राहून स्वत:च्या कृतीनं दिलं. १९५६ ते १९६० या काळात त्यांनी दिल्लीशी प्रतारणा तर केली नाहीच, शिवाय महाराष्ट्रातही कमालीचा विवेक पाळून द्विभाषिक राबवलं. १ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

यशवंतराव द्विभाषिकाच्या चक्रव्यूहात शिरले होते. या नव्या पुनर्रचनेत राज्याचं स्वरूप संमिश्र निर्माण झालं. क्षेत्रफळाच्या बाबतीत हे राज्य भारतीय संघराज्यातील पहिलं आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं बनलं. क्षेत्रफळ एक कोटी नव्वद लक्ष चौरस मैलापेक्षा अधिक आकाराचं झालं. या प्रचंड राज्याचा राज्यकारभार परिणामकारक आणि सुलभ रीत्या व्हावा यासाठी त्यांना अखंड धावाधाव करावी लागली. मनस्थितीवर आणि कौटुंबिक वातावरणावर ताण पडावा अशी ही स्थिती होती. १९५८ मध्ये दिल्लीहून पत्नीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपली मनस्थिती नमूद केली. ते लिहितात -
------------------------------------------------------------

नवी दिल्ली
११ डिसेंबर १९५८
 
प्रिय सौ. वेणुबाई,

सकाळी घरून निघताना कष्टी अंत:करणाने बाहेर पडलो. तुझ्या निराश उद्गारांनी आणि खिन्न चेहेऱ्याने सबंध प्रवासच अस्वस्थ चित्ताने झाला. मीटिंग कशीतरी आटोपून परत आल्यावर आता लिहीत आहे.

गेले काही महिने, विशेषत: काही आठवडे जसे काही एखादे वादळ निर्माण व्हावे असे आयुष्यात निर्माण झाले आहे. मी पुष्कळ विचार केला व करीत आहे की असे का व्हावे? गेल्या सोळा वर्षांचा चित्रपट डोळ्यापुढून गेला. अनेक संकटे आपण एकत्र भोगली. हृदये करपून जावीत अशा आपत्ती आल्या. अकरा वर्षांपूर्वी ती. गणपतरावांच्या मृत्यूचे वेळी तर मी आता मोडून जाईन अशी माझी मलाच भीती वाटत होती. त्या सर्व यातनांना तुझ्या संगतीमुळे मी कसेतरी तोंड देवू शकलो. त्यानंतरच्या तुझ्या आजारामुळे पुन्हा वैराण वाळवंटात शिरतो की काय असा धाक निर्माण झाला. पण तू स्वत: धैर्याने त्यालाही तोंड दिलेस. आणि माझी हिंमत वाढविलीस. पुन्हा नव्या आशेने पुढे जावू लागलो. १९५२ ते १९५५ च्या कठीण राजकीय काळातही तू माझी खरी सोबतीण म्हणून साथ केलीस. कितीतरी कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जिवाभावाच्या मित्राचे कार्य केलेस. तुझी साथ नसेल तर मी एकटा काही करू शकेन अशी माझी मन:स्थिती नाही. तुझ्या निरागस सोबतीशिवाय मी निरर्थ व्यक्ती ठरण्याचा संभव आहे. माझ्या वाढत्या जबाबदारीबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर माझे आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल असा धाक मनात निर्माण झाला आहे. हातातील कामाकडे पुरे लक्ष लागत नाही त्यामुळे मी माझ्या जबाबदारीच्या कामात एखादी गंभीर चूक करीन की काय अशी भीती वाटू लागली आहे.