विरंगुळा - २९

सकाळी आठ वाजता येथे पोहोचल्यापासून ते अगदी अक्षरश: आतापर्यंत मोरारजीभाई एकसारखे कार्यक्रमाच्या गर्दीत होते. मी व डॉ. जीवराज काही वेळ सकाळी त्यांचेबरोबर होतो पण नंतर संध्याकाळी सहापर्यंत आम्ही अमरेली प्रश्नाच्या चर्चेसाठी स्वतंत्र होतो.

सकाळी बडोद्याहून आकाशमार्गे आम्ही येथे पोहोचलो. बडोदा ते राजकोट एक तासाचा प्रवास हसत खेळत केव्हा झाला तेच समजले नाही. पांढऱ्या शुभ्र मेघराजीतून प्रवास करताना आकाशाच्या पोकळीतून कोणी 'प्रवासी हिमालय' इतस्तत: फिरतो आहे असे वाटते. सौराष्ट्राचे पंतप्रधान श्री. ढेबरभाई हे बडोद्यापासून आमच्याबरोबर होते. श्री. ढेबर यांची माझी प्रथमच ओळख झाली. आज सर्व दिवसभर या माणसाच्या संगतीत होतो. अत्यंत विनयशील आणि मृदुस्वभावाचे गृहस्थ आहेत ते. आपला मुद्दा सहजासहजी न सोडण्याइतके कणखरही दिसले. मनुष्य-स्वभावाची पारख करण्याची धूर्तताही असली पाहिजे. परंतु हा गुण कुणाच्या लक्षात येऊ नये याची ते काळजी घेत आहेत की काय असे वाटण्याइतके शब्द मोजून तोलून धीमे धीमे बोलणारे, चालणारे गृहस्थ आहेत.

राजकोटची भेट माझ्या लक्षात राहण्याइतक्या महत्त्वाच्या दिवशी मी सहजासहजी या गावात आलो. तिथीप्रमाणे आज गांधीजयंती आहे. या जयंतीचे गांधींनी 'रेटिया बारस' असे नामकरण पूर्वीच केलेले आहे. आज मोठ्या उत्साहाने ही जयंती सौराष्ट्र 'रचना समिती' ने साजरी केली. राजकोट गावाशी गांधीजींचा फार जिव्हाळ्याचा संबंध. गांधीजींचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण या गावात झालेले. गांधीजींचे जवळचे नातेवाईक आजही या गावात राहात आहेत. त्यांचा नातू कनू गांधी हा आजच्या या समारंभाचा सूत्रचालक होता. या समारंभासाठीच श्री. मोरारजी मुद्दाम आले. विशेषत: संध्याकाळी सभेच्या आधी जवळजवळ एक हजार स्त्री पुरुष ओळीने शांतपणे बसून आपापल्या चरख्यावर भक्तिभावाने सूत कातताना मी जेव्हा पाहिले तेव्हा मला गांधीजींच्या काठीयावाडमध्ये आल्यासारखे वाटले. आजचा दिवस माझ्यासाठी एक चांगला शिक्षणाचा दिवस असाच होता असे दिसले. शांतपणे, निर्विकारपणे चाललेल्या चर्चा ऐकणे-पाहणे केव्हा केव्हा अतिशय हिताचे असते. मनात विचारांची गर्दी उसळू पहात आहे. तेव्हा लेखन थांबविणे हाच मार्ग बरवा!
-यशवंतराव
------------------------------------------------------------

अमरेली
१७ सप्टेंबर १९५२

सकाळी राजकोटहून येथे दहा वाजता पोहोचलो. ७५ मैलांचा हा मोटारीचा प्रवास वाटला होता तसा काही त्रासदायक झाला नाही. रस्ता चांगला नाही असे ऐकत होतो परंतु आपल्या भागात ज्याला आपण वाईट रस्ता म्हणू असा रस्ता एक फर्लांगभरही कोठे लागला नाही. पहिले १५ मैल तर झक्क 'टार' रोड, मधून मधून सिमेंट रोड होता.
 
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पीकपाण्याकडे सहजच लक्ष जात होते. महाराष्ट्रातील कुठल्यातरी जिल्ह्यातून जात आहोत अशी शेतीवाडी दिसली. काळी जमीन, बाभळी, लिंबाची अनेक झाडेझुडपे, विहिरीवर चालू असलेले मोटपंपाचे 'रीं रीं' संगीत. वातावरणात बरेचसे साम्य मराठी शेतीजीवनाशी दिसते. हा विचार माझ्या मनात मोटारच्या प्रवासात चालू असतानाच दुसरी सहज एक गोष्ट माझ्या लक्षात आली.