विरंगुळा - २८

कालच्या बैठकीत चर्चेस व भाषणात थोडे 'बाळसे' आल्यासारखे वाटले. दूर बसून भाषणे ऐकण्यात काही औरच चव असते. अशा चांगल्या भाषणांत मौलाना आझादांचे विदेशी नीतिसंबंधीच्या ठरावावर भाषण झाले. तो ठराव त्यांनी मांडला. मौलाना साहेबांचे इतके चांगले भाषण १९४५ नंतर मी प्रथम ऐकले. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व, रंगढंगदार उर्दू शब्दांची खैरात, विषय मांडण्याची हातोटी या सर्वांची पुन्हा एकदा प्रचिती आली. विशेषत: 'यूनो' च्या विफलतेविषयी शंका असतानाही तिला चिकटून राहण्याचा भारताचा निग्रह का? हे समजावून सांगताना एका पारशी काव्यपंक्तीची मदत घेऊन त्यांनी ते इतके खुलवून सांगितले की युक्तिवाद म्हणूनही तो मुद्दा किंचितसा लुळापांगळा आहे असे दिसत असतानाही ऐकणाऱ्याला त्या क्षणापुरती का होईना भुरळ पडावी. वालुकामय मैदानात असणाऱ्याला मृगजळ दिसते. तहानलेला पाणी पाणी करून त्याचे पाठीमागे धावतो आणि शेवटी निराश होतो. पुन्हा मृगजळ दिसते, पुन्हा पळतो पण पुन्हा निराश होतो. त्याची तहान खरी असते. तो म्हणतो की मृगजळाला मी फसलो नाही, किंवा फसत नाही. त्या शहाण्याला उद्देशून तो पारशी कवी म्हणतो की बाबा ते खरे आहे पण तुझी तहानच खरी नाही त्याला तू काय करणार? जागतिक शांततेसाठी तहानलेला भारत युद्धपरिस्थितीच्या रेताड जागतिक मैदानात 'यूनो' कदाचित ते मृगजळ असले तरी - पाठीमागे धावतो आहे. -समर्पक दृष्टांताचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. विचार म्हणून यातील दोष दाखविणे सोपे आहे. परंतु त्या दृष्टीने हे मी लिहीतच नाही.

काल संध्याकाळी पंडितजींचे भाषणानंतर बैठकीचे सूप वाजले. सभासदांनी पाठविलेल्या तीन ठरावांची चर्चा झाली. राजप्रमुख पद्धतीचे उच्चाटन करण्यासंबंधीचा ठराव चांगल्या पद्धतीने मांडला गेला होता परंतु हा तात्त्विक स्वरूपाचा ठराव पंडितजींच्या खुलाशानंतर मागे घेतला गेला. पंडितजींच्या भाषणाने माझे निदान समाधान झाले नाही आणि त्यामुळे मूलभूत स्वरूपाचा ठराव मागे घेतला ही चूक झाली असे मला वाटले आणि अजूनही वाटते.
 
दुपारी धार, मांडवगड वगैरे करून आलो. बहुतेक प्रसिद्ध शहरे पाहून घेत आहे. इंदोर येथे साडी निवडली आहे खरी परंतु ती पसंत पडणार नाही अशी 'धास्ती' मनात आहेच.
-यशवंतराव

रतलामहून रेल्वेने बडोद्याला आणि पुढे मोरारजी देसाई यांच्या समवेत ते राजकोट, अमरेली या शहराकडे गेले. राजकोट येथून ता. १५ सप्टेंबरला ते लिहितात-

राजकोट
१६-९-१९५२

आता रात्रीचे ११ वाजले आहेत. जामनगर हाऊसमधे जुन्या कोणा राजाच्या शयनगृहात मी आता झोपण्याच्या तयारीत आहे. लांबलचक खोल्या, दिव्यांचा झगमगाट अशा एका विस्तीर्ण विभागात मी एकुलता एक मनुष्य आता कसा झोपणार? झोप तरी कशी येणार? सहजासहजी माणसाला भीती वाटावी असे हे शोभायमान एकाकीपण आहे.