यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch ५

५. लपलेले संपन्न व्यक्तिमत्त्व (नारायण पुराणिक)

माझा व यशवंतरावांचा परिचय कै. ह. रा. महाजनी ह्यांनी करून दिला.  मी तेव्हा लोकसत्ता-नॅशनल स्टँडर्डचा वार्ताहर होतो.  ह. रा. महाजनी लोकसत्तेचे संपादक होते.  मी आणि महाजनी दोघंही 'किर्लोस्कर' मासिकाचे लेखक असल्याने आमचे संबंध तसे जुने होते.  यशवंतराव तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते, पुढे मंत्री झाले.  एकदा ओळख झाल्यावर संबंध वाढत गेले.  त्यांना भेटून अनेक विषयांवर आम्ही बरेच वार्ताहर चर्चा करीत असू.

परिचय वाढला तसे व्यक्तिगत संबंध वाढत गेले.  अनेकदा त्यांच्या कार्यालयात भेटी होत.  पण बर्‍याच वेळी कार्यालयाबाहेरही होत.  यशवंतरावांचे वाचन भरपूर, मनाची घडण साहित्याची, वृत्ती राजकारणाची आणि जाणीव मात्र चतुरस्त्र.  माझ्यातला त्यांच्यातला औपचारिक शिष्टाचाराच्या पद्धतीने बोलण्याचा काळ फारसा टिकला नाही.  दोघंही अगदी खेड्यात, गरिबीत जन्मलेले.  गरिबीचे चटके कुठे, कसे बसतात ह्याची खूप मोठी जाणीव यशवंतरावांना होती.  त्यांचा अनुभव राजकारणाचा, माझा लष्कराचा आणि वृत्तपत्रांचा.  आम्ही मराठी इंग्रजीचे मिश्रण करून अनेक विषयांवर बोलत असू.  त्यातून मला जाणीव झाली की यशवंतरावांच्याकडून मला खूप शिकायला मिळत होतं.  लहान वयातच मी लष्करात गेलो आणि सहा वर्षे ब्रिटिशांच्या सैन्यात व मुख्यतः ब्रिटिश सैनिकांत काढले.  महाराष्ट्राची माहिती मला फारशी नव्हती.  महाराष्ट्रीय राजकीय पुढार्‍यांचीही नव्हती.  यशवंतराव मला ती देत आणि प्रत्यक्ष राजकीय घटनेखालील प्रवाह समजावून सांगत.  

माझ्या स्वभावाची पूर्ण जाणीव असल्यामुळे यशवंतराव पुष्कळदा मला मुद्दाम बोलायला लावीत.  म्हणत, ''तुझ्या पद्धतीने तू बोल.''  यामुळे अनेकदा आमच्या चर्चांना शाब्दिक सामन्यांचे स्वरूप येई.  भोवताली इतर माणसे असली तर त्यांना आमची ही पद्धत बरीच अनुचित वाटायची.  एकदा मुकुंदराव किर्लोस्करांच्या घरी यशवंतरावांना जेवायचे आमंत्रण दिले.  काही विषयांवर मोकळेपणी बोलता यावे म्हणून मुकुंदरावांच्या घरची माणसे व आम्ही किर्लोस्कर मासिकात काम करणारे दोघेतिघेच होतो.  यशवंतराव तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  कुळकायद्याचा विषय निघाला.  उदाहरण देताना वतनदार-जमीनदार ह्यांच्या वागण्याची उदाहरणे यशवंतरावांनी दिली.  ती सांगली, सातारा, कराड भागावतली होती.  त्यात ''कुळकर्णी'' वर्गाचा उल्लेख आलाच.  मी म्हटलं की गरीब आणि विधवा ह्यांना तरी काही रक्षण दिले पाहिजे.  विधवा ब्राह्मण असो की मराठा, तिचे प्रश्न सोडवणं सोपं नसतं.  बहुतेक विधवा जुन्या वळणाच्या, निरक्षर, कायद्याच्या बाबतीत अज्ञानी असतात.  बोलता बोलता यशवंतराव म्हणाले, ''हो, काही अशा असतात आणि त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते.''  मी म्हटलं, ''अहो, पण मुख्यमंत्र्यांची सहानुभूती वाण्याला देऊन माल मिळत नाही किंवा बँकेत दिल्याने रुपये मिळत नाहीत.  तेव्हा नुसत्या सहानुभूतीने काय होणार.''

भोवतालच्या लोकांना माझा प्रश्न शिष्टाचार मोडणारा वाटला.  यशवंतराव दोन मिनिटं माझ्याकडे पाहात राहिले, हसले आणि लगेच म्हणाले, ''नारायणची पद्धत मला चांगली माहीत आहे.  रागावण्यासारखं यात काही नाही.''

यशवंतराव मुख्यमंत्री असताना एखाद्या कामासाठी भेटायला गेलो तर निरोप देत, ''तासभर थांबावे लागेल, नाहीतर रात्री घरी ये, मोकळेपणाने बोलता येईल.''

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मी 'लोकमान्य' दैनिकात होतो.  लोकमान्य दैनिक 'जन्मभूमि' गटाचे व जन्मभूमि गटाचे प्रमुख तेव्हा शांतिलाल शहा होते.  शांतिभाईंना मराठी चांगले येत असे आणि शांतिभाई हे मुंबईच्या जुन्या काँग्रेस पुढार्‍यांपैकी.  संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोर वाढला आणि 'गुजराती' गटाचे मराठी दैनिक म्हणून 'लोकमान्या'ला निंदा व नुकसान सोसावे लागले.  पुढे 'जन्मभूमि' 'जन्मभूमीच्या' विश्वस्तांनी 'लोकमान्य' बंद करायचे ठरविले.  आम्ही सगळेच बेकार होणार होतो.  शांतिभाईंनी मला व माझे मित्र कै. शंकरराव सालये ह्यांना सचिवालयात बोलावून (ते मंत्री होते) सारे समजावून सांगितले.  आम्ही लोकमान्याच्या कार्यालयात गेलो व सार्‍या सहकार्‍यांना ते सांगितले.  सर्वांनी सूचना केली व महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीने लोकमान्य दैनिकाची जबाबदारी घ्यावी.  यशवंतरावांना भेटून हे सारे सांगायचे काम माझ्यावर आले.  मी लगेच फोन केला व वेळ ठरवून गेलो.  यशवंतरावांनी सांगितले, ''हा निर्णय मालोजीराव नाईक निंबाळकरांनी घ्यायचाय.  त्यांना भेट.  मी सांगतो भेटशील म्हणून.''  दुसर्‍या दिवशीची वेळ ठरली व मी नाईक निंबाळकरांना भेटलो.  मी सगळे आकडे घेऊन गेलो होतो.  ते सारे 'लाखातले' आकडे पाहून निंबाळकर म्हणाले, ''इतका पैसा लागेल असे मला वाटलं नव्हतं.''  मी म्हटले, ''दैनिक गुजरात्यानं चालवलं काय अन् महाराष्ट्रीय माणसानं चालवलं काय, जमाखर्चाचे आकडे तसेच राहणार.''