यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १७

लवचिकत्व

अधिक पावसाळे खाल्यामुळे कडक न होता मऊ व चिवट होणा-या सागवानाप्रमाणे यशवंतरावांचे व्यक्तिमत्व होते.  या त्यांच्या लवचिकपणाचे श्रेय सतत सिंहावलोकन करीत, परिस्थितीचा अदमास घेत आणि परिस्थितीशी मिळतेजुळते घेत वाटचाल करण्याची त्यांनी लहानपणापासून जोपासलेल्या सवयीला द्यावे लागते.  ''गावात शिरून मोठाल्या हवेल्या पाहिल्या, तरी जिथून शिरलो, ती वेस विसरायची नाही'' ('ॠणानुबंध' : २०) हा स्वभावधर्म झाल्यामुळे सत्ता वा वैभवाचा ताठरपणा त्यांच्या आयुष्यात कोणत्याच टप्प्यावर शिरला नाही.

चव्हाणांच्या या लवचिकपणावर त्यांच्या टीकाकारांनी बराच आक्षेप वेळोवेळी घेतला होता.  स्वतः चव्हाणांनी या आक्षेपकांना कधी प्रत्युत्तर दिलेले आढळत नाही.  पण अन्यत्र तात्यासाहेब केळकरांबद्दल लिहीत असताना केळकरांच्या तडजोडवादी स्वभावाचे समर्थनपर स्पष्टीकरण चव्हाणांनी दिले आहे, त्यातून अप्रत्यक्षतः त्यांच्या स्वतःच्याही भूमिकेची कैफियत मिळू शकते.  ते म्हणतात, :

''केळकरांना 'तडजोड' प्रिय होती, याचे कारण त्यांची विचारशैलीच तशी होती.  भावना जेव्हा उद्दीपित झालेल्या असतात, तेव्हा अशा विचारशैलीच्या लोकांची उपेक्षा होते.... पण मध्यममार्ग पत्करणा-यांना हा धोका पत्करावाच लागतो.... अशा विचारवंतांची किंमत व्यवहारातील चलनी नाण्याप्रमाणे कमी-जास्त कधीच होत नाही, तर त्यांची किंमत वस्तुगुणनिष्ठ (इंट्रिन्झिक) असते'' (कित्ता, २४०).