यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - १३६

डोंगराच्या वळचणींतून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत सपाटीवरून धावताना दिसतात. या पाच बहिणींचे परस्परांवरचे प्रेम मोठे अमर्याद. जन्मस्थळी त्यांचे वेगळे अस्तित्व दिसते; पण ते तेवढ्यापुरतेच. फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे, असे दिसावे तोच त्या हातांत हात घालून, गोफ विणून, एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात. मग मात्र यांतील कृष्णा कोणती, कोयना कोणती आणि वेण्णा कोणती? दिसते, ती एक धार. गोमुखातून ही शुभ्र धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत, वेगवेगळ्या वाटांनी या बहिणी निघून जातात. पुढे कुठेतरी डोंगरावरून उड्या मारताना दिसतात. परंतु एक गोष्ट मात्र खरी, उगमापासून शंभर मैलांच्या आंतच या बहिणींचा मिलाफ होतो आणि कराडपासून त्या कृष्णामय बनूनच सागराच्या भेटीसाठी निघतात. जरा धारदार अंगाची कोयना कराडला, आपल्या बहिणीला – कृष्णाबाईला कडकडून भेटते. संगमावर मग आनंदाचा कल्लोळ होतो. या ठिकाणी पोचलेल्या या सर्वजणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि सुगंधित आणि चविष्ट बनून पांथस्थांची तहान शमविण्यासाठी आणि आसपासच्या परिसरास दिलासा आणि ओलावा देण्यासाठी पूर्वमुखी होऊन दक्षिणेकडे निघते.” सिमला, उटीपासून युरोप व अमेरिकेतल्या काही सुंदर शहरांची त्यांनी उत्तम वर्णने केली आहेत.

मायकेल फूट हे ब्रिटिश मजूर पक्षाचे नेते होते. ढंगदार व्यक्तित्वाचे मायकेल फूट, यशस्वी संपादक व लेखक होते. मजूर पक्षीय नेते अन्युरिन बेव्हन, हॅजलिट, एच. जी. वेल्स इत्यादींची त्यांनी लिहिलेली चरित्रे गाजली. त्यांची ग्रंथसमीक्षणे वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यांनी म्हटले आहे की, ‘सत्तापदावर असलेल्या व्यक्तींना वाचनासाठी वेळ नसतो; पण जे वाचत नाहीत ते सत्तापदावर राहण्यास पात्र नसतात.’ यशवंतरावांचे ग्रंथप्रेम, वाचन आणि पाठांतर पाहिल्यावर मायकेल फूट ज्या प्रकारच्या अधिकारपदस्थांची अपेक्षा करत होते त्या वर्गात यशवंतरावांची गणना होत होती.

वयाच्या पहिल्या काही वर्षांतील गरिबी व तीमुळे होणारी ओढाताण, नंतर राजकारणातील धकाधकी यांमुळे यशवंतरावांचे मन निबर न बनता, ते कायम संवेदनाशील राहिले. ज्याप्रमाणे राजकारणामुळे संवेदनशीलता कमी झाली नाही त्याचप्रमाणे संवेदनशीलतेमुळे अधिकारावर असताना आवश्यक असेल तेव्हा खंबीरपणे निर्णय घेण्यात कसूर केली गेली नाही. यशवंतरावांच्या व्यक्तिगत गुणांचा अनुभव त्या वेळच्या अनेकांना आला. त्याची ओळख नंतरच्या पिढीच्या लोकांना या संबंधात कोणी काय लिहून ठेवले असेल, त्यावरून होऊ शकते. कर्तबगार व्यक्ति त्यांच्या अंगच्या गुणांमुळे त्यांच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावतात;  पण अनेकदा असे दिसते की, त्यांच्या ह्यातीनंतर त्यांच्या आठवणी राहतात, पण त्यांच्या मागे त्यांच्या कार्याचा मागमूस राहत नाही.

याचे कारण अशा अनेक व्यक्तींनी संस्थात्मक असे बदल केले नसतात. मरणोत्तर कीर्तिरूपाने जगलेले अनेक मिळतात, पण दीर्घकाळ समाजाच्या जीवनावर परिणाम होतो, तो अशा व्यक्तीने संस्थात्मक परिवर्तन घडवून आणले असेल तर. एकदोन उदाहरणे द्यायची तर महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन करून, महाराष्ट्रात महिला शिक्षणाच्या प्रसाराची कायमची सोय केली, नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मराठा समाजात शिक्षणाचा प्रसार करणारी संस्था स्थापन केली आणि तिचा विस्तार होत गेला. यास प्रारंभ झाला तो छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत. या धर्तीवर यशवंतरावांनी मराठवाडा (नंतर डॉ. बाबासाहेब आंबडेकर असे नामांतर झालेले) व कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी विद्यापीठ यांची स्थापना करण्याच्या कामी पुढाकार घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रात भांडवलसंचय होण्यास मर्यादा पडलेली आसताना, सहकारी तत्त्वाचा स्वीकार करून सहकारी साखर कारखान्यांना मोठी चालना दिली. यात नंतर दोष निर्माण झाले असतील, पण निदान पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात मोठे परिवर्तन होण्यास ही चळवळ कारणीभूत झाली. महाराष्ट्राच्या जीवनावर यामुळे दीर्घकालीन परिणाम झाला.

आज महाराष्ट्र हा देशाचा एक घटक आहे  असे न मानता, तो वेगळा असल्याची भूमिका घेऊन राजकारण करण्याची घातक प्रवृत्ती बळावत चालली आहे. इतकेच नव्हे, तर निवडणुकीच्या राजकारणामुळे जाती व पोटजाती यांच्या नावावर राजकारण होऊ लागले आहे. अशा वेळी महाराष्ट्र देश मोठा व्हावा, पण देश मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल, ही यशवंतरावांची भूमिका विशेष महत्त्वाची      ठरते. यशवंतरावांचे व्यक्तित्व विवेकी तर कर्तृत्व विधायक होते. म्हणून संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वीच्या काळातील कमालीचे तापलेले वातावरण ते बरेचसे शांत करू शकले आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले. यशवंतरावांनी दोन विद्यापीठे स्थापन करून फार वर्षांची लोकांची मागणी पुरी केली. सहकारी क्षेत्र व्यापक व चैतन्यशाली बनवून विधायक कर्तृत्वाला आणि सार्वजनिक पुरुषार्थाला वाव दिला. यामुळे अनेक संस्था वाढल्या व कार्यकर्ते तयार झाले. यशवंतरावांचे  हे खरे स्मारक असून ते स्मरणात राहणारे आहे.