यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३३-०८१०२०१२-१

मी म्हणालो, कशाबद्दल साहेब ?

उपरातला लक्ष्मण आणि आताचा लक्ष्मण, कसे वाटते ?

स्वप्नातल्यासारखे.  मी असे स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हतो.  एवढे सत्कार, एवढे हार, एवढ्या शाली.  वर्तमानपत्रातल्या बातम्या.... सारे जमिनीवरून पाय निघावेत असेच.  आपल्यासारखे वडीलधारे, शशीसारखी पत्‍नी, बाबा, अनिल, सुनंदासारखे मित्र.  या सर्वांनी मला जमिनीशी घट्ट ठेवले आहे.

त्यावेळी मी बाबा आढावांच्या बरोबर काम करीत होतो.  आमचा बाबा आढाव यांच्याबद्दल संवाद सुरु झाला.  बाबांबद्दल साहेबांना फार आस्था होती.  समाजवादी मित्रांबद्दल ते फार चांगले बोलत.  समाजवादी मंडळी बोलायला, बसायला, चर्चा करायला, वैचारिक स्पष्टता येण्यासाठी कष्टपूर्वक वाचन-चिंतन करणारे लोक.  माणूस म्हणून फार चांगली माणसे.  सभ्य, सुसंस्कृत, शालीन, एकमेकांवर हमरीतुमरी होऊन चर्चा करतील, भांडणे करतील, मतभेदांचे रूपांतर लगेच गटातटात होईल, पण माणूस म्हणून फार छान.  मैत्रीला छान.  फक्त लक्ष्मण, ती आपल्या उपयोगाची नसतात.  बाबा आढावांसारखी अपवाद.  बोलायला, बसायला उत्तम, कामाच्या उपयोगाचे नाहीत.  काही काम करून समाज उभा करतील अशी फार थोडी.  बाबा त्यातले एक.  सतत काम करीत असतात.  मला त्यांचे फार कौतुक वाटते.  सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पद काहीही नसताना काम करीत राहणे सोपे नाही.  त्याने मग एकारलेपणा येतो.  सार्‍याच अभावग्रस्ततेमध्ये काम करायचे.  स्वतःची चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून, दवाखाना बंद करून ते 'एक गाव एक पाणवठा' चळवळ करीत आहेत.  आम्हा राजकारण्यांचे बरे असते.  कणभर केले तरी मणभर दाखवता येते.  स्वार्थी माणसांचा राबता मोठा असतो.  त्यामुळे माणसांची पारख करावी लागते.  सगळ्यात मोठा हार घेऊन माणूस आला की समजायचे याचे कामही तसेच मोठे असणार.  माणूस हार घेऊन आला की मी मनात म्हणत असे पोहोचलो,  पोहोचला म्हणजे खुर्चीला पोहोचला.  खाली वाकून पाय धरले की समजावे याच्यापासून जपून राहायला हवे.  आणि गर्दीत आला, चोरून पिशवीतून काही आणले असेल तर समजावे हा यशवंतराव या माणसावर प्रेम करणारा.  मग पिशवीत कधी भाकरी, कधी मिठाई, कधी कागदांचे पुडके.  मग तेवढ्याच प्रेमाने मिठी मारून म्हणे, साहेब, भेटायला आलो.  भाकरी आणलीय, धपाटी हायेत,  उसळ बी हाये.  मग गर्दीतून डोंगरे त्याला बाजूला नेत.  गर्दी पांगली की मग आमचे बोलणे होत असे.  लांबलांबून आलेले शेतकरी, स्वातंत्र्यसैनिक हे खरे जीवभावाचे.  मला आठवत नाही की बाबा माझ्याकडे कधी काही मागायला आले आहेत.  ते आले असते तर त्यांचे सोने केले असते, पण फार तत्त्वनिष्ठ.  बहुजन समाजातला माणूस पण एस. एम. नी अशी काही संस्कारांची जादू केलीय की बापू काळदाते, बाबा आढाव, बापूसाहेब पाटील असे कितीतरी तरुण विचाराने बांधीलकी मानून काम करीत आहेत.  मलाच कधीकधी आश्चर्य वाटते,  कसे जमते हे !  स्वार्थ मोठा असतो.  उलट बाबांनी एकदा माझा रस्ताच अडवला.  प्रश्न हमाल-माथाडी मंडळींचा होता.  मी एका कार्यक्रमाला जाणार होतो.  पेपरात बातमी, बाबा आढाव रस्ता अडवणार.  मोठमोठे मथळे.  मी पोलिसांना सांगितले,  मी बाबांना जाऊन भेटणार आहे.  तुमचा मार्ग सांगा.  पोलिसांनी मला सांगितले, प्रथम कार्यक्रम करावा मग बाबांना भेटावे.  त्यांना आपल्याकडे आणता येईल.  मी म्हणालो, नको, नको.  मी जाईन वेगळ्या रस्त्याने.  कार्यक्रम केला नि परत आलो तो थेट रस्त्यावर बसलेल्या बाबा आढावांजवळ. मांडी घालून त्यांच्याशी बसून बोलू लागलो.  बाबा नि मी काय वेगळे आहोत ?  रस्त्यावर बसलेली, अंगमेहनत करणारी माणसे माझीच होती ना ?  बाबांचे मला कौतुक वाटे.  त्यांना काय वाटे मला माहीत नाही.  एकदा तर त्यांनी माझी धरणाच्या जागेची पूजाच उधळून टाकली.  आमचे लोक फार संतापले होते.  बाबाने पूजा उधळली.  शेतकर्‍यांचे पुनर्वसन आधी करा.  आधी पुनर्वसन मग धरण.  मी धरणग्रस्तांच्या वेदना माझ्या भाषणातून मांडल्या.  

मी मध्येच म्हणालो, साहेब, ती पूजा बाबांनी उधळली.  त्याचे आयुष्यभर परिणाम त्यांना भोगावे लागले.  ते कधी बोलत नाहीत त्याबद्दल.

साहेब खजिल होऊन म्हणाले, म्हंजे काय झाले ?

ताटाचा काठ डोळ्याला लागला.  तो डोळा कायमचा अधू झाला.  एका डोळ्याने त्यांना दिसत नाही फार.

अरे देवा, पण मला कुणी बोलले नाही.  वेणूबाईंच्या नावाने मी पाच एकर शेती घेतली होती उरळीकांचनला.  तेव्हाही, मंत्र्यांनी शेती घ्यावी कशाला म्हणून त्यांनी आम्हा लोकांच्याविरोधी आंदोलन केले होते.