अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 3

काँग्रेस संघटनेला व राष्ट्रनेत्यांना महाराष्ट्रांतील आघाडी सांभाळणारा नवा माणूस श्री. चव्हाणांच्या स्वरुपांत सापडला. त्यामुळे द्विभाषिक मुंबई राज्याचे नेतृत्व श्री. चव्हाणांना प्राप्त झालें. श्री. चव्हाणांच्याबद्दल महाराष्ट्रांत या क्षणापर्यंत खूपच विविध प्रकारचे गैरसमज होते. त्यामुळेच द्विभाषिक मुंबई राज्याचें मुखय-मंत्रिपद प्राप्त झाल्यानंतर अनेक आश्चर्याचे धक्के देत श्री. चव्हाणांचें कर्तृत्व उजळून विकसित होऊं लागलें. विशेषत: मुंबईच्या पुंजीपति प्रतिष्ठितांना नवाच शोध लागला. बहुजन समाजांत मुंबईच्या विश्वजनीन, बहुरंगी व प्रगत संस्कृतीचा राज्यकारभार पेलणारा माणूस असेल, याची शक्यताच वाटत नव्हती. मुंबई हीच संयुक्त महाराष्ट्राच्या आड आलेली धोंड होती. म्हणूनच हृदयपालट घडवून आणणें हाय संयुक्त महाराष्ट्राचा उपाय होय, असे श्री. चव्हाण महाराष्ट्रांतील जनतेला प्रत्येक सभेमधून सांगत असत. श्री. चव्हाणांनी मुंबईचें हृदय जिंकले. त्यामुळेच त्यांना संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करतां आलें.

लोकशाहीचा नेता

श्री. चव्हाण हे केवळ एका राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवीत नाहीत. लोकशाहीचा नेता, हें त्यांचे वैशष्टय आहे. लोकशाहीचा नेता असलेल्या राज्यकर्त्याने लोकांच्या चळवळींवर शस्त्र शक्य तोपर्यंत वापरतांच कामा नये, असा दंडक श्री. चव्हाण यांनी स्वत:चे तत्त्व म्हणून स्वीकारलेला दिसतो. असें त्यांच्या गेल्या पांच वर्षांतील कृतीने सिद्ध केलें आहे. अहमदाबाद येथील प्रक्षोभक आंदोलन, सार्वत्रिक अखिल भारतीय संप व महाविदर्भवादी चळवळ यांतील त्यांचे वर्तन त्यांच्या अहिसावादित्वाचें गमक ठरतें.

"बलवानाची अहिंसा हीच खरी अहिंसा," या गांधीच्या सिद्धान्ताचें आचरण करण्याची संधि सशस्त्र वा राज्यधारी यांसच लाभत असते. स्वातंत्र्यपूर्व अहिंसक आंदोलन हें निर्बळ म्हणजे नि:शस्त्र जनतेचे आंदोलन होतें. काँग्रेसच्या हातीं सत्ता=बल=शस्त्र आल्यानंतर 'बलवानाची अहिंसा' या सिद्धान्ताचा प्रयोग करण्याची संधि प्राप्त झाली आहे. आमच्या सत्ताधा-यांशी जगांतील इतर सत्ताधा-यांची तुलना करण्याच्या प्रसंगी आमच्या मंडळीचा गांधीवादी वारसा प्रथम लक्षांत येतो. राज्यसत्ता वापरतांना हा अहिंसावादी वारसा, नव्या लोकशाही नेतृत्वाचें रहस्य ज्यांस समजेल तेच चालवूं शकतील. खरेंखुरें आधुनिक लोकशाही नेतृत्व म्हणजे पक्षीय नेतृत्व नव्हे, कारण विसाव्या शतकाच्या मध्यान्हांत डावे व उजवे भेद सुद्धा पाश्चात्य राष्ट्रांत वरपांगी ठरत आहेत; भारतांतहि तसे ते ठरूं शकतील. पक्षातील भावनेचे लोकशाही नेतृत्व भारतात काय किंवा अन्यत्र काय, वाढीस लागलें तरच त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचें मर्मग्रहण होऊं शकेल; हें मर्म ज्या प्रज्ञावंतास अधिक समजू शकेल तोच राष्ट्रीय वा जागतिक राजकारणास योग्य वळण देऊं शकेल. श्री. चव्हाण राज्यकाभारांत विरोधी पक्षांनाहि विश्वासांत घेतात, हें अशा व्यापक लोकशाही नेतृत्वांचेंच लक्षण आहे.

धीरोदात्त म मधुर व्यक्तिमत्त्व श्री. चव्हाणांच्या ठिकाणी विकास पावत आहे याचा प्रत्यय आता केवळ महाराष्ट्रासच नाही तर सर्व भारताला येऊं लागला आहे.

सहयात्रीला पांच वर्षापूर्वी दिसलेले व्यक्तिमत्त्व

श्री. यशवंतराव चव्हाण यांचें मूल्यमापन व गुणग्रहण करणारे अनेक उच्च दर्जाच्या लेखकांचे लेख या अभिनंदन ग्रंथांत प्रसिद्ध होत आहेत. या सर्व लेखांतील मूल्यमापन व गुणग्रहण सारांश रूपाने करणारें अचूक भविष्यवादी लेखन तर्कतीर्थ जोशी यांनी श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्य मंत्रिपदाच्या ग्रहणाच्या समयींच म्हणजे १७ फेब्रुवारी १९५७ या तारखेच्या 'मौज' साप्ताहिकाच्या अंकांत केले होते.त्याची आठवण प्रस्तुत अभिनंदन ग्रंथांतील लेख वाचतांना झाली. म्हणून तो लेख आम्ही तेथे उद्धृत करीत आहोंत. त्यांत यशवंतरावांच्या खाजगी जीवनाचें व स्वभावाचेंहि दर्शन घडतें. वास्तव तो येथे उद्धृत करणें अधिकच उचित ठरतें.

- संपादक