सह्याद्रीचे वारे - १६

जनप्रेमाची शक्ति

काल संध्याकाळी येथें आल्यापासून मी अशा कांहीं वातावरणांत आहें कीं, एक प्रकारचें भारावलेलें, दबलेलें मन जसें असावें तशी माझ्या मनाची स्थिती झाली आहे. माझ्यावरील आपल्या प्रेमामुळें आपण माझ्यावर जो स्तुतीचा वर्षाव केला त्यामुळेंच कदाचित् माझी ही मनःस्थिति झाली असेल. परंतु मला वाटतें राजकारणामध्यें वादग्रस्त असणा-या माणसानें आणि त्यांतल्या त्यांत अधिकारावर असणा-या माणसानें आपल्यासंबंधी होणारी स्तुति बिनधोक चालू देण्यामध्यें बरेच धोके असतात. श्री. तुळशीदासजी आणि श्री. महाजनी यांनीं जें आतां येथें सांगितलें तें मला मान्य आहे. माझी अशी भावना आहे कीं, माझी नाव सरळ चालायची असल्यास शिव्या देणारीं माणसें आवतींभोंवती असलीं पाहिजेत. मग कांही फारशी धास्ती वाटत नाहीं. कारण त्यामुळें मनुष्य मग आत्मनिरीक्षण करतो. माझ्या आयुष्यांतील गेलीं तीनचार वर्षे फार महत्त्वाचीं अशीं गेलीं. त्यावेळी अतिशय कांटेतोलपणानें मी पावलें टाकीत होतों, विचार करीत होतों आणि शिव्याहि खात होतों; पण डरत नव्हतों ही गोष्ट खरी आहे. परंतु आपल्या या स्तुतीमुळें एक प्रकारचा भ्रम निर्माण होण्याचा संभव आहे असें मी मानतो. मी शब्दांना फसणारा माणूस नाही. तुम्ही वापरलेले सगळेच शब्द आणि सगळींच विशेषणें खरीं आहेत असें मानून चालावयाचें झालें, तर त्यासाठी माणूस एकतर भोळा तरी असला पाहिजे किंवा अहंकारी तरी असला पाहिजे. तरच तो आपली ही सर्व स्तुति खरी मानील. माझा असा दावा आहे कीं मी दोन्ही नाहीं, एवढें तरी निदान माझ्यासंबंधानें मला बोलावयास हरकत नाही असें मला वाटते.

पण मला एकाच गोष्टीची चिंता आहे. अशा या प्रसंगीं खूप माणसें चांगलें बोलायला लागलीं म्हणजे अकारण, नाहीं तिथें असूया निर्माण होते. परंतु आज ज्या प्रवृत्तीचें, ज्या शक्तीचें आणि ज्या सत्तेचें मी प्रतिनिधित्व करीत आहें त्याला कसलीहि दृष्ट लागूं नये अशी माझी इच्छा आहे. आपल्यावरच्या सावल्या आणि आपल्यावर लागणारी दृष्ट यांची झळ नवीन होणा-या बाळाला लागूं नये अशी आईची चिंता असते. तशीच चिंता माझ्या मनाशीं आहे. कारण नवीन जन्माला येणा-या आपल्या या राज्याला अनेक संकटांच्या सावल्यांतून जावयाचें आहे. त्यांपैकी कांहीं सावल्या बाहेरच्या आहेत आणि कांहीं आंतल्या आहेत. परंतु या नवीन कामाचें प्रतिनिधित्व करणारी जीं आम्ही माणसें आहोंत त्यांच्या संबंधींच्या भावना, त्यांच्यावर येणारे आरोप यांची झळ त्या कामाला लागतां कामा नये. आज सकाळीं बोलतांना घाबरल्याबद्दलचा मीं जो उल्लेख केला तो या संदर्भात होता. व्यक्तिशः 'घाबरणें' हा शब्द मी माझ्या कोशांतून बरेच दिवसांपूर्वी पुसून टाकला आहे. परंतु माझ्यासंबंधींच्या आपल्या या आत्यंतिक प्रेमाच्या भावनेमुळें कांही ठिकाणीं अकारण मत्सर निर्माण होऊन त्याची झळ या राज्याला तर लागणार नाहीं ना, अशी भीति माझ्या मनाला चाटून गेली हें मात्र खरें !