शब्दाचे सामर्थ्य २४४

पण त्या दिशेने आज प्रगती किती केली, हे जेव्हा पाहावयाचा प्रयत्‍न करतो, तेव्हा माझ्या मनाला निराशा वाटते. विशेषतः परवा मराठवाड्यात झालेली उग्र निदर्शने व दंगली पाहिल्या, म्हणजे आमच्या आशावादाचा, तात्पुरता का होईना, पण पराभव झाला आहे, असे मला वाटते. या जातीयतेच्या अंधारामध्ये कोणालाही वर येता येणे शक्य नाही. का, कोण जाणे, निव्वळ या कामासाठी आयुष्य वाहून घेण्याची जरुरी आहे, असा तीव्र विचार माझ्या मनात येऊन गेला. हे कार्य संपवायचे म्हटले, तर सर्वांनी पराकाष्ठा केली पाहिजे, नाही तर आमच्या या समाजात निराशेच्या अंधाराशिवाय दुसरे काहीच उरत नाही.

माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात गेल्या अनेक वर्षांच्या काळात एका गोष्टीसंबंधी वारंवार निराशेचा अनुभव करावा लागला आहे. मला वाटते, माझा हा राजकारणातील अनुभव इतरांनासुद्धा आला असेल. राजकारणामध्ये यशस्वी होणे एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे लागते, माणसे सांभाळावी लागतात, वाढवावी लागतात व त्यासाठी असंख्यांच्या मनाची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाचा फणा उभारतात. अशा स्वभावाचे काही नमुने पाहिल्यानंतर मी निराश होतो. मला राग येत नाही, पण निराशेचा मात्र तीव्र अनुभव होतो. मला वाटते, कदाचित हा जीवनाच्या खेळातील एक आवश्यक भाग असेल. राजकारणात निदान सरळ रेषेत काहीच चालत नाही. कदाचित इतर क्षेत्रांतही चालत नसावे. सरळ रेषेची ही संकल्पना फक्त भूमितीतच पाहायची. वास्तव जीवनात दिसतात, त्या अनेक समांतर रेषा किंवा एकमेकांना छेदून त्रिकोण, चौकोन करणा-या रेषा. हेही खरे आहे, की आकर्षक वळसे घेत मनोरम चित्ररेखा उभ्या करणा-या रेषाही असतात, त्यांना विसरून चालणार नाही. जीवनाची ही वास्तविकता गृहीत धरून चालावे लागेल व ती हसतमुखाने स्वीकारल्याने मनुष्य निराशेच्या कक्षेबाहेर पडू शकेल.

अगदी अलीकडे मी अनुभविलेला आनंदाचा व आशेचा क्षण असाच अनपेक्षितपणे आला. १९७७ च्या जानेवारीमध्ये मी परराष्ट्रमंत्री म्हणून रूमेनियाच्या भेटीसाठी गेलो होतो. हिवाळ्यातील बर्फाच्छादित युरोपचे माझे हे पहिले दर्शन. त्या वर्षी बर्फही काहीसे जास्तच पडले होते. रूमेनियाच्या भेटीचा माझा हा शेवटचा दिवस होता. आदल्याच दिवशी 'ब्रशाव्ह' या बुखारेस्टपासून शंभर-एक मैलांवर असलेल्या शहरी जाऊन आलो होतो. येताना वाटेत हिवाळी शुभ्र सौंदर्याने नटलेल्या कार्पेथियनच्या रांगा डोळे भरून पाहिल्या होत्या. या पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर स्थळी राष्ट्रपतींच्या विश्रामधामी जाऊन अध्यक्ष श्री. चाउशेस्की यांचेशी पुरेपुर दोन तास महत्त्वाच्या चर्चाही झाल्या होत्या. या शेवटच्या दिवशी विदेश मंत्र्यांची निरोपाची गाठभेट व आमच्यातर्फे द्यावयाचा रात्रिभोज एवढेच काम शिल्लक उरले होते. गेले चार दिवस ओळीने युरोपियन खाना खाऊन कंटाळलो होतो. त्या दिवशी दुपारी राजदूत श्री. कौल यांच्या घरी हिंदुस्थानी 'डाळभात' खाण्याचा आमचा बेत होता. आमचे जेवण चालू असतानाच अडीच वाजण्याच्या सुमारास टेलिफोनची घंटी वाजली. टेलिफोन घ्यावा, म्हणून श्री. कौल उठून गेले. मीही माझे जेवण संपविले व निवांत हात धूत होतो. तेवढ्यात राजदूत घाईघाईने माझेकडे आले व म्हणाले, 'तो बेलग्रेडचा फोन आहे. तेथील कॉन्सल मला काही सांगत नाही. तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावयाचे, म्हणतो. तुमच्यासाठी काही मेसेज आहे.'

मी टेलिफोन घेतला, तेव्हा त्या कॉन्सलने आपले नाव सांगितले व प्रधानमंत्र्यांचा १७ तारखेचा संदेश हिंदीत वाचून दाखविला. संदेश होता, की त्या संध्याकाळी प्रधानमंत्री लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. मला काहीशी कल्पना होती, परंतु खात्री नव्हती. पण आता संदेश ऐकून मनावरचे ओझे एकदम हलके झाले. आणखीन दोन देशांचा दौरा करून मला परत जायचे होते. पंरतु आता परत जाण्यात औचित्य होते. सार्वत्रिक निवडणुकांना आम्ही कायमचे मुकलो, की काय, अशी धास्ती गेली कित्येक महिने वाटत होती, ती नाहीशी झाली.

मी माझ्या पत्‍नीला त्या दिवशी तेथूनच पत्र लिहिले, त्यात म्हटले आहे की, 'बहुतेक सर्व राजबंदी सुटतील व निवडणुकीचे वातावरण प्रस्थापित होईल. This is a gain. हवा मोकळी होईल. आज मी आनंदात आहे.' आणि तो दिवस खराच आनंदाचा होता. बुखारेस्ट शहराचे आकाश ढगाळलेले होते. हवा व वातावरण तीव्रतम थंडीमुळे उदास होते. पण तो संदेश ऐकल्यानंतर दिवसभर माझ्या मनात सकाळच्या कोवळ्या उन्हाचा उल्हास होता - एका नव्या आशावादी दृष्टीने भवितव्याकडे पाहण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली होती.