शब्दाचे सामर्थ्य २४३

मी त्या वयात एक पत्र माझ्या बंधूंच्या पत्त्यावर लिहिले व त्यात त्यांना परत यावयास सांगितले. त्यांचे उत्तर आले, की पिके तोंडावर आली आहेत. ती सोडून कसा येऊ? पण पिके काढण्यासाठी लागणारे पैसेही जवळ नाहीत, असेही उत्तर आले. ते पत्र पाहिल्यानंतर, का, कोण जाणे, माझ्या भावाला एकटे सोडून परत आलेल्या त्या सधन स्नेह्याबद्दल एक प्रकारची अढी माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मनावर एकदम निराशेचे सावट आले. दूरदेशी असलेला आपला भाऊ अडचणीत आहे आणि आपण त्याकरता काही करू शकत नाही, यातून निर्माण झालेली असहायता ही विलक्षण अशी होती. कित्येक आठवडे मी त्याच मनःस्थितीत होतो. आयुष्यभर मी अनेक संकटांमधून प्रवास केलेला आहे, त्यामुळे पुष्कळ वेळा मन निराशेने आकसून गेल्याचे मला आठवते, पण या वेळी मी जेवढा निराश झालो होतो, तेवढा केव्हाही झालो नाही. काही आठवड्यांनंतर एका दिवशी सकाळी पाहतो, तो माझा भाऊ घरी परत आलेला दिसला. अंगावर खाकी कपडे, अर्धी पँट घातलेल्या व थकून गेलेल्या माझ्या भावाची मूर्ती पाहून मी त्याच्या गळी पडलो. बराच काळ दबलेल्या निराशेने अश्रूंद्वारे वाट काढली. माझा भाऊ माझी समजूत काढीत होता, 'अरे, असे दबून कसे चालेल ? मला यातूनही काही शिकायला मिळाले.'

त्यानंतरचा मला आठवणारा व मी बराच जाणता झाल्यानंतरच्या काळातला माझा अनुभव : १९३९ च्या दुस-या महायुद्धाबरोबरच हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीत उलाढाली सुरू झाल्या. त्या वेळी पुण्यात कायद्याच्या अभ्यासासाठी राहत होतो. काहीशा जहालवादी राजकीय विचारसरणीतून माझी राजकीय वाढ झाली होती. मी ज्या विशिष्ट गटाबरोबर काँग्रेसमध्ये काम करीत होतो, त्यांच्याजवळ व काँग्रेसजवळही अशा ऐन मोक्याच्या वेळी स्वातंत्र्य-संग्राम तीव्र करण्याचा कसलाच कार्यक्रम नव्हता. एका प्रकारची दिशाहीनता तीव्रपणे जाणवू लागली. यातूनच माझ्या निराशेच्या कालखंडाला सुरुवात झाली. त्या काळात मी अनेकांशी चर्चा केल्या, बरोबरीच्या स्नेह्यांशी रात्रीच्या रात्री जागून वाद केले. डेक्कन जिमखान्यावर गुडलक रेस्टॉरंटमध्ये पीला हत्ती सिगारेटचा धूर सोडीत व तो पाहत मी तासन् तास एकाकी बसून काढले. लॉ. कॉलेजमध्ये हजेरी देण्यापलीकडे अभ्यासात माझे लक्ष नव्हते. देश नेतृत्वहीन झाला आहे, की काय, असे वाटू लागले. मनाचा कोंडमारा झाला होता. एकट्याने काही करावे, अशी शक्यता बुद्धीला पटत नव्हती. त्या वेळची ती निराशा माझ्या मनात घर करून कित्येक महिने राहिली होती. त्या वेळी माझ्या अभ्यासाचे वर्ष फुकट गेले. दुसरेही काही घडले नाही. निराशेच्या पोटी कृतिशून्यता निर्माण होते, असे म्हणतात, ते माझ्याबाबतीत या वेळी खरे ठरले.त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळीचा काळ आला. आयुष्यातील महत्त्वाच्या संधीचा हा काळ आहे, या भावनेने भारावून जाऊन मी या काळात उडी घेतली. आशा-निराशावादाचा माझ्या आयुष्यातील हा कालखंड मी फार महत्त्वाचा मानतो. निराशेच्या काळात मनुष्य पुष्कळ वेळा अंतर्मुख होतो. आपल्या उणिवा तपासतो. त्या अर्थाने निराशेचे क्षण हे जीवनाला शक्ती देणारे क्षण असतात, असे मला वाटते. यातूनच कर्तृत्वाची संधी प्राप्त होत असते.

भारत छोडो चळवळीच्या काळातील १९४३ चा एक दिवस मला आठवतो. त्या दिवशी मी विलक्षण निराश झालो. भूमिगत अवस्थेत काम करीत असताना त्या दिवशी माझा मुक्काम पुण्यात होता. महात्मा गांधींचे आगाखान पॅलेसमध्ये उपोषण चालू होते आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अशा काळातील तो दिवस होता. भूमिगत अवस्थेत मी माझ्या एका मित्राच्या घरी राहत होतो. त्या संध्याकाळी त्या माझ्या मित्राने येऊन बातमी सांगितली, की महात्माजींची प्रकृती फार खालावली असून, ते आता काही तासांचेच सोबती आहेत. ही बातमी ऐकल्यापासून ती सबंध रात्र मी एक प्रकारच्या, पूर्वी कधीही न अनुभवलेल्या निराशेने खचून काढली. म. गांधींशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाच्या यशस्वितेची शक्यता वाटत नव्हती. गांधीजींशिवाय हिंदुस्थान कसा असेल, तेच मनाला उमगत नव्हते. हे एवढे सारे दुःख होते, परंतु डोळ्यांत पाणी येत नव्हते. अश्रू सारे आटले होते. सगळे व्यर्थ आहे, असे वाटत होते. ती सर्व रात्र मी जागून काढली. पहाट होताच मित्राला वर्तमानपत्रे आणायला सांगितली. वर्तमानपत्रात गांधींची प्रकृती अस्वस्थ आहे, परंतु धोका नाही आणि सरकार त्यांची सुटका करणार आहे, अशी बातमी आली होती. ते वाचून काहीसे बरे वाटले. माझ्यासारखे असे सहस्त्रावधी लोक त्या दिवशी अशीच चिंता करीत असतील, अशी जाणीव मला झाली. ही निराशेची रात्र मी कधीही विसरू शकणार नाही.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची व्यवहार्य शक्यता आहे, या विचाराचा धागा माझे हाती १९५७ च्या अखेरी आला. तेव्हापासून तीन-चार वर्षांचा काळ हा एक नव्या आशावादाने भारून गेलेला काल आहे. १९५९ साली महाराष्ट्र राज्य निर्मिती शक्यतेपासून निर्णयाप्रत पोहोचली होती. कृषि-औद्योगिक विकासावर आधारलेली नवी अर्थरचना, महाराष्ट्रातील दलित व पुढारलेल्या समाजातील मानसिक दुरावा दूर करून सामाजिक एकतेची नवी वाटचाल व शतकानुशतक एकमेकांपासून वेगळे असलेल्या विभागांना एकात्मतेचा अनुभव हे माझे कार्यक्रम जीव ओतून पुरे करण्याची ही सुवर्णसंधी आहे, या दृष्टीने मी या नव्या राज्याकडे पाहत होतो. ५९-६० साली या नव्या राज्यासंबंधी मी केलेली भाषणे परवा 'सह्याद्रीचे वारे' या माझ्या पुस्तकामध्ये मी चाळून पाहत होतो, त्या भाषणांमध्ये माझा त्या काळचा आशावाद ओतप्रोत भरलेला दिसून येतो.