यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८८

१२) “धर्म हा व्यक्ती आणि परमेश्वर यांच्या मधला संबंध आहे, हिंदू आपल्या मंदिरात परमेश्वराला आळविण्याचा प्रयत्न करतो तर मुसलमान आपल्या मशिदीत अल्लाशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो... परंतु हे सर्व संपल्यावर मंदिरातून, मशिदीतून, गुरूद्वारातून किंवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही किंवा ख्रिस्ती नाही, तो फक्त भारतीय आहे ही भावना आपल्या मनात रूजली पाहिजे.”
(युगांतर-८९)

१३) “मी जेव्हाय राजकारण करीन तेव्हा माझ्या राजकारणामध्ये मी धर्माला प्राधान्य देणा नाही. तेथे धर्माला स्थान नाही. राजकारणामध्ये जेव्हा धर्माला प्राधान्य येते, तेव्हा ते राजकारण जातीयवादी बनते.”
(युगांतर ३०३)

१४) “हिंदुस्थानात उजून उघडी नागडी हिंडणारी गरीबी ही जर अशीच हिंडत राहणार असेल, तर या स्वातंत्र्याला आणि आज आपण करीत असलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ राहणार नाही. आम्हाला ही गरीबी हटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनाची गुलामगिरी हटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या समाजामध्ये प्रत्येक मनुष्य स्वाभिमानाने आपली उंच मान करून निर्भयपणे वावरू शकेल, त्याला पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळेल, त्याला आपल्या बुद्धीचा आणि शिलाचा विकास करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारचा समाज आपल्याला निर्माण करावयाचा आहे.”
(युगांतर पृ. ५९-६०)

१५) “आमच्या घराला सुखाचा स्पर्श झालेलाच नव्हता. वडील आणि नंतर थोरले बंधू सरकारी नोकरीत होते – पण एक सामान्य नोकर म्हणून. ते होते बेलिफ. घरची जमिन चार – पाच एकर. तेही माळरान. दोन-चार पोती धान्य देणारं. मी मॅट्रिक होऊन नोकरीत शिरल्यानं निदान दोन वेळा घरची चूल तरी पेटणार होती. वडिलांनी दारिद्र्यात आणि अर्धपोटी अवस्थेत जगाचा निरोप घेतला होता. आम्हा मुलांना जगवण्यासाठी आई हाडाची काडं करत होती. दिवसभर कष्ट करावे आणि संध्याकाळची चूल पटवावी, असं तिचं जीवन. कष्ट, कष्ट आणि कष्ट हेच तिच्या जीवनाचं सार. आम्हाला धीर देणं हे तिच्या कष्टाचं आणखी एक अंग होतं. पण मला आईचं मोठेपण दिसत होतं, अनुभव येत होते, ते तिच्या मनाच्या मोठेपणाचे! मुलं परिस्थितीनं दुबळी आहेत, याची बोच आईच्या मनाला होती. ‘नका, बाळांनो, डगमगू’, ही तिची ओवी मी ऐकत होतो. त्यामुळं माझं अवसान दुप्पट होत असे. परिस्थितीनं माणसं स्वार्थी बनतात, एकमेकांचं शत्रुत्व करतात, आपल्यापुरतं पाहतात, हे मी अवतीभोवती पाहत होतो. अनुभवित होतो. पण घरात एक वेळेला चूल पेटविणारी आई या सा-याच्या पलीकडची होती. जेवणवेळेला कुणी आलं, तर आपल्या घासातला अर्धा घास घालण्यासाठी ती बैचैन असे. कुणी नको म्हटलं, तर रागवायची.”
(कृष्णाकाठ, आत्मवृत्त)