साहेब यशवंतरावजी चव्हाण-१०

हे साहसी आणि रोमांचकारी नाटय
माझ्या तरूण मनाला सुखवीत होतं!!! तुरूंगात जायची शक्यता सध्या तरी हुकली होती-
मनाची उमेद वाढली होती...
(उल्हासदायी सुरावट)
“यशवंता, आता रे कुठं जायचं?”
“कोकणात, रत्नागिरीला!”
“रत्नागिरीला जायला तू एवढा उत्सुक का रे बाबा?” “ कारण,
मी अजून समुद्र पाहिलेला नाही; आणि दुसरं असं की,
तिथं सावकार रहातात!” हा मुद्दा राघूअण्णांना पटला.
(उजव्या कोप-यातून निळाशार प्रकाशझोत येतो)
मि-या बंदराच्या बाजूला जाऊन
मी लख्खदिशी समुद्र पाहिला...
ओ हो हो! केवढा त्याचा विस्तार!!!
(बासरीचे उत्साहदायी स्वर...)
कार्तिक महिन्यातल्या शांत सकाळी,
सागराचं ते रूप मला निळयाभोर आकाशासारखं प्रसन्न वाटलं!
मी पाहिलेला- तो पहिला समुद्र,
जन्मात कधीही विसरू शकणार नाही!

दुस-या दिवशी सकाळी १० वाजता
आम्ही सावरकरांच्या घरापाशी पोचलो.
जिना चढून वर गेलो-
... मध्यमशी खोली... चार खुर्च्या... आम्ही बसलो.
आतून स्वातंत्र्यवीरांचा आवाज कानावर येत होता.
ते बाहेर आले, आम्ही उठून उभे राहिलो-
त्यांना नमस्कार केला:
मध्यम उंची, किरकोळ बांधा, डोळयांवर चष्मा-
त्या पलिकडून समोरच्याचा वेध घेणारी त्यांची ती भेदक नजर... अंगात
स्वच्छ सदरा, सैलसं धोतर, पायात साध्या वहाणा अशा घरगुती वेषात ते होते.
(शांत सुरात) “एवढा लांब प्रवास करून का आलास बाळ?”
राघूअण्णांनी त्यांना बिळाशच्या बंडाची हकीकत सांगितली, तेव्हा त्यांच्या
तेजस्वी डोळयात मला किंचित हसू दिसलं-
म्हणाले, “ मोठेच पराक्रमी दिसता!” (मिस्किल हसतात)
त्या हसण्यात कौतुकाचा भाग जास्त होता. थांबून म्हणाले,
“तुम्हाला काही विचाराचंय् का?”
“मला फक्त आपल्याला डोळे भरून पहायचं होतं,”मी म्हणालो.
ते उठून माझ्याजवळ आले; म्हणाले,
“माझ्यात पहाण्यासारखं काय आहे?
मी तुमच्यासारखा माणूस आहेतुमच्या आधी काही वर्षं जन्मलो, एवढंच!
देशसेवेचं व्रत घेतलं, बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागल- आता
तुमची पिढी काय करते,
ते बघायचं- बस्स!!”
तात्यांनी आम्हाला सदिच्छा दिल्या.
सागर आणि सावरकर मला एकाच वेळी रत्नागिरीत भेटले.
(पडद्यातून ‘जयो SS स्तुते.... जे जे उत्तम, उन्नत’ ह्या गाण्याच्या ओळी एकू येतात)