साहेब यशवंतरावजी चव्हाण-६

कुणी म्हणालं, “हा गरूडखांब-“
मी त्याला हात लावला, तर कुणीतरी ओरडलं:
“ए, हात लावू नकोस!
बाई, तुमच्या या पोराला सांभाळा-“
शेवटी, कसेबसे विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत पोचलो.
देवाच्या पायावर डोकं टेकवण्याएवढी काही माझी उंची नव्हती-
पुजारी आईवर खेकसला:
“चला,व्हा पुढं-“
तिकडं दुर्लक्ष करून, आईनं मला उचलून
विठ्ठलाच्या पायावर घातलं!
पुढं नावलौकिक मिळाल्यावर,
सत्ताधारी झाल्यावर मी अनेकदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं-
पण, लहान असताना,
आईनं त्याच्या पायावर जे घातलं,
त्याची अपूर्वाई अवर्णनीय होती!!
“ह्यात श्रद्धेचा भाग किती?” असं लोक विचारतात.
त्यांना मी नेहमी सांगत असे:

“कुठल्याही एका दगडाच्या मूर्तीत देव आहे,
असं मी मानीत नाही.
पण, ज्या ठिकाणी समाजपुरूष नतमस्तक होत आला आहे,
तिथं नतमस्तक होणं श्रेयस्कर आहे,
असं मी मानतो!
त्यानं माझ्या मनाला एक प्रकारचं आंतरिक समाधान मिळतं!”

नाटकाची गोडी तशी मला लहानपणापासूनच होती.
‘माईसाहेब’ नाटकात तर मी कामसुद्धा केलंय्
किर्लास्करवाडीला....
औंधकरांचं ‘बेबंदशाही’ पाह्यलं;
‘प्रेमसंन्यास’ मधलं केशवराव दात्यांचं काम पहायला,
थेट कोल्हापूरला जाऊन आलो!
तिथं रहायंची सोय नव्हती, म्हणून अपरात्रीच परत निघालो-
स्टेशन शांत, हवेत थंडी... आडोसा फक्त भिंतीचा!
“ए पोरांनो! गाडी नसताना तुम्ही इंथ ठेसनात काय करताय रं?”
पोलिस खेकसला.
“नाटक बघायला आलो व्हतो-“
“फकस्त नाटक पघाया?”
“हो! आणि पहिल्या गाडीनं परत जाणार कराडला-“
“मंग खुशाल झोपा बाकडयावर!”
पोलिसातसुद्धा कधीकधी चांगली माणसं भेटतात (हशा)

१९२९ साल.
डिसेंबर ३१... शेवटची रात्र.
रावी नदीच्या तीरावर, पंडितजींनी संपूर्ण स्वातंत्र्याचा
पहिला उद्घोष केला!
२६ जानेवारी हा पहिला ‘स्वातंत्र्य-दिन’ साजरा करायचा, असं ठरलं.
ते ‘प्रतिज्ञा-पत्र’ वाचायचं काम माझ्याकडे आलं.
कृष्णाकाठाची ती सुंदर सकाळ,
मी कधीही विसरू शकणार नाही!!
ख-या अर्थानं माझं राजकीय जीवन सुरू झालं-
(पडद्यामागून गाणं ऐकू येतं)
शान न इसकी जाने पाए
चाहे जान भलेही जाए
विश्व विजय करके दिखलाए
तब होवे प्रण पूर्ण हमाराट
झण्डा उचा रहे हमारा || धृ||