आमचे मुख्यमंत्री -१९

मुख्यमंत्री

श्री. बाळासाहेब खेरांनी प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणाने निवृत्ती घेण्याचे ठरविल्यामुळे १९५२ साली श्री. मोरारजी मुख्यमंत्री झाले. जरी ते त्यावेळी झालेल्या निवडणुकीत हरले तरी त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे असा पं. नेहरूंनी आदेश दिला व त्यांना मुख्यमंत्री होता यावे म्हणून विधानमंडळ कॉंग्रेस पक्षाची घटना दुरुस्त केली. कारण श्री. मोरारजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. नंतर ते सहा महिन्यांच्या मुदतीत निवडून आले.

१९५२ ते १९५६ पर्यंत कर्नाटक, गुजराथ व महाराष्ट्र ह्या तीन विभागांचे मुंबई राज्य होते. परंतु ह्यावेळी भाषावार प्रांतिक रचनेकरता निवृत्त न्यायाधीश फझलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला. त्या समितीच्या शिफारशीनुसार कर्नाटक मुंबई इलाख्यातून वेगळा झाला. मुंबई हे द्विभाषिक राज्य झाले.परंतु गुजरातच्या लोकांनी महागुजरातकरता हिंसक चळवळ केली. मुख्यमंत्री मोरारजींनी उपवास केला. महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राकरता चळवळ झाली. मोरारजींनी ह्या चळवळीविरुध्द कठोर पावले उचलली व त्याचा परिपाक म्हणजे आत्माहुती दिली त्यांचे स्मारक १९६० नंतर हुतात्मा चौकात उभारण्यात आले. श्री. सी.डी. देशमुख ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राकरता आपल्या अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

ह्याच वेळी गुजरात कॉंग्रेस कमेटीने द्विभाषिक राज्याला ठराव करून मान्यता दिली आणि द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मोरारजी देसाई हे द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होण्यास तयार होते, परंतु त्यांना नेते म्हणून एकमताने बिनविरोध मान्यता हवी होती.तथापि श्री. भाऊसाहेब हिरे ह्यांच्या पर्यायी नेतृत्वाने श्री. मोरारजी यांना विरोध करण्याचे ठरविले व ह्यामुळे श्री. मोरारजींनी आपली उमेदवारी मागे घेऊन पर्यायी नेते म्हणून श्री. यशवंतराव चव्हाण यांचे नाव सुचविले. अशा त-हेने श्री. यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबईचे पहिले मुख्यमंत्री झाले.

१९५६ ते १९६० पर्यंत श्री. यशवंतरावांनी द्विभाषिकाचा कारभार पाहिला. परंतु द्विभाषिकाविरुध्द लोकक्षोभ होता. त्याला जनमान्यता नव्हती. आपला क्षोभ व्यक्त करण्याकरता त्यांनी पं. नेहरूंविरुध्दही मोर्चे काढले. अंततः जनादेश नसल्यामुळे द्विभाषिक राज्य चालविण्यास ते असमर्थ आहेत असे श्री. यशवंतरावजींना कॉंग्रेस श्रेष्ठींना सांगितले. परिणामी १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन महाराष्ट्राच्या स्वतंत्रराज्याच्या आकांक्षेला दाद मिळाली. श्री. यशवंतरावजी फक्त दोन वर्षें संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते व चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी पं. नेहरूंनी श्री. यशवंतरावांना संरक्षणमंत्रिपदासाठी पाचारण केले. अशा त-हेने सह्याद्री हिमालयाच्या रक्षणाकरता धावला!