कथारुप यशवंतराव-सागर आणि सावरकर

सागर आणि सावरकर

लहानपणापासूनच यशवंताला भव्यतेचं आकर्षण होतं. कर्तबगार व्यक्तींबद्दल त्याला मनस्वी आदर होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्वासंबंधी अनेक गोष्टी यशवंताने ऐकल्या होत्या. ' श्रद्धानंद ' नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध होणारी ' माझी जन्मठेप ' ही सावरकरांची आत्मकहाणीही त्याने वाचली होती. स्वातंत्र्यासाठी अवघे जीवन वेचणा-या या देशभक्तास एकदा डोळे भरून पहावे असे त्याला वाटू लागले. कृष्णाकाठी वाढलेल्या यशवंताने अजून समुद्र पाहिला नव्हता. समुद्राच्या भव्यतेविषयी त्याने फक्त ऐकले होते. पण एकदा अगदी अनपेक्षितपणे या दोन्हींचे दर्शन घेण्याची संधी यशवंताला मिळाली.

१९३० साली बिळाशीच्या सत्याग्रहात सामील होण्यासाठी यशवंता आणि राघुअण्णा लिमये बिळाशीला गेले. तिथे शेतक-यांची सभा घेऊन ते मलकापूरला आले. राघूअण्णा म्हणाले, ' यशवंता, आता इतक्या दूर आपण आलो आहोतच, तर सरळ खाली कोकणात जाऊया.'

' कोकणात जाऊन आपण काय करणार ?' यशवंताने विचारले.

' अरे , आमचं लिमयांचं मूळ गाव इथून जवळच आहे. ते गाव पाहू आणि पुढे रत्नागिरीला जाऊ.'

रत्नागिरीचे नाव ऐकताच यशवंत एकदम खूश झाला. तो म्हणाला, ' रत्नागिरीला गेल्यावर समुद्र आणि सावरकर यांचे दर्शन एकाचवेळी घेता येईल. फार चांगली कल्पना आहे. चला कोकणातच जाऊया.' त्याप्रमाणे दोघे लिमयांच्या गावाला व तिथून पुढे रत्नागिरीला गेले. नारळ आणि पोफळीच्या झाडांनी वेढलेल्या रत्नागिरी शहरात ते मनसोक्त भटकले. मि-या बंदराच्या बाजूने चालत असताना अचानक लख्खदिशी समुद्र नजरेसमोर दिसला. यशवंताचे मन हरखून गेले. कार्तिकातल्या निळ्याभोर नभासारखे दिसणारे समुद्राचे ते विशाल रूप दोघांनी डोळे भरून पाहिले. यशवंताच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्यादिवशी रत्नागिरीतच थांबून दुस-या दिवशी सकाळी ते दोघे सावरकरांना भेटायला त्यांच्या घरी गेले. बाहेरच्या खोलीत त्यांना बसायला सांगितले गेले. आतल्या खोलीत सावरकर कोणाशीतरी बोलत होते. ते लोक गेल्यानंतर सावरकर या ' बालक्रांतिकारांना ' भेटण्यासाठी बाहेर आले. राघुअण्णा व यशवंताने उठून त्यांना नमस्कार केला. सावरकरांनी त्यांचे कुशल विचारले.

' मी यशवंत चव्हाण, कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकतो.' यशवंताने आपली ओळख करून दिली.

' एवढ्या लांब प्रवास कशासाठी केलास बाळ ?'  सावरकरांनी विचारले. त्यावर राघुअण्णा म्हणाले, ' आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. बिळाशीच्या बंडात सहभागी होण्यासाठी आलो होतो.'

' मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही  !' खळखळून हसत सावरकर म्हणाले, काही वेळ इतर विषयासंबंधी बोलणे झाल्यावर सावरकर म्हणाले, ' तुम्हाला मला काही विचारायचंय काय ?'
यशवंता म्हणाला, ' निदान मला तरी काही विचारायचं नाही. मला फक्त आपणास डोळे भरून पाहायचं होतं.'

यशवंताचा हा आदरभाव सावरकरांच्या हृदयाला भिडला. ते उठून त्याच्याजवळ आले. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, ' माझ्यात बघण्यासारखं काय आहे ? मीही तुमच्यासारखाच एक माणूस. तुमच्या अगोदर काही वर्षे जन्माला आलो. देशसेवेचं व्रत घेतलं आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असं काय आहे ? आमच्या पिढीने आम्हाला जे योग्य वाटलं ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते ते पहायचं आहे.' आणि गंभीर होऊन सावरकर खाली बसले.

त्यांच्या मनाच्या सागरात उसळणा-या देशभक्तीच्या लाटा यशवंताला स्पष्टपणे जाणवल्या. त्यांच्या घरातून बाहेर पडताना यशवंता मनाशी म्हणाला, ' ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहे. आज मी एकाच वेळी समुद्र आणि सावरकर पाहिले. दोघांपैकी अधिक भव्य कोण हे ठरवणे अवघड आहे  ! '