कथारुप यशवंतराव-पुणे जिंकणारे यशवंतराव

पुणे जिंकणारे यशवंतराव

सन १९३१ सालची गोष्ट. यशवंता तेव्हा क-हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत होता. या जिज्ञासू विद्यार्थ्याला भाषणे करण्याची व ऐकण्याची खूप आवड होती. टिळक हायस्कूलमध्ये होणा-या वक्तृत्वस्पर्धेत तो आवर्जून भाग घ्यायचा. त्यावेळी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात दरवर्षी वक्तृत्वस्पर्धा होत असत. त्या स्पर्धेत भाग घेण्याची यशवंताची खूप इच्छा होती.
१९३१ साली पुण्यात होणा-या त्या वक्तृत्वस्पर्धेत यशवंताने भाग घेतला. पुण्याला जायचे तर पैसे हवेत, पण ते तर जवळ नव्हते. आता काय करायचे ? सुदैवाने श्री. शिवाजीराव बटाणे यांनी त्याला मदत केल्याने ती काळजी मिटली.

त्या स्पर्धेत विद्यार्थ्याला आयत्यावेळी विषय देऊन दहा मिनिटे बोलायला सांगत असत. यशवंताला ' ग्रामसुधारणा ' हा विषय देऊन बोलायला सांगण्यात आले. त्याचे भाषण ऐकूण परीक्षक फार खुश झाले. त्यांनी त्याला आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला. यशवंताने आपल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली. सर्वांनी त्याचे कौतुक केले व त्या स्पर्धेत यशवंताला पारितोषिक मिळाले.

नंतरच्या आयुष्यात यशवंतरावांनी पुणे शहरात अनेक भाषणे केली आणि त्या प्रत्येक भाषणाने त्यांनी पुणेकरांची मने जिंकली, पण त्याची सुरूवात यशवंता हायस्कूलचा विद्यार्थी असताना झाली होती.
' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे जसे खरे आहे, तशी वक्त्याची ' वाणी ' अशा वक्तृत्व स्पर्धेत दिसते हेही तितकेच खरे  !