यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-६

यशवंतरावांच्या भाषणांनी वैचारिक व ललित निबंधाचा दर्जा प्राप्त केलेला आहे. साहित्याच्या दृष्टीने त्यांच्या भाषणांचे संकलित ग्रंथ 'सह्याद्रीचे वारे' 'युगांतर' व 'भूमिका' हा एक साहित्याचा अनमोल ठेवा आहे. ललित निबंध वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून त्याचे मूल्यमापन करावेसे वाटते. मुद्देसूद मांडणी, अंत:करणाला भिडणारी भाषा, राजकीय दूरदृष्टी यांचा संगम त्यांच्या भाषणात दिसतो. ग्रामीण जीवनपद्धती, विविध स्तरावरील सुसंस्कृत व्यक्तीचा सहवास या सर्वांचा संस्कार त्यांच्या या ललितरूपी भाषण साहित्यावर झालेला आहे. यशवंतरावांनी साहित्याच्या माध्यमातून मराठी माणसाला स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारा विचार मांडलेला आहे. एकूणच राष्ट्राची उभारणी करण्याचा मनोदय त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

साहेब जाऊन अनेक वर्षे झाली. पण त्यांच्या भाषणांच्या संकलनातून ते स्मरणात राहिले. मला साहेबांना जवळून पाहण्याचा किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा योग आला नाही. महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेत असताना एक दोनदा त्यांची भाषणे ऐकली व त्यांना पाहिलेही आहे. त्यावेळी त्यांची मूर्ती मनात ठसली गेली. ती स्पष्ट होत गेली ती त्यांच्या साहित्यातून आणि तशीच मनात बिंबली गेली. त्यांच्या साहित्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना लेखनाबद्दल व लेखकांबद्दल ओढ होती, जिव्हाळा होता, त्यांच्याजवळ प्रतिभाही होती. भाषण करताना त्यांना कधी वाचून दाखवावे लागले नाही. ते त्यांना आपोआप स्फुरत असे. समोरच्या जनसमुदायाला प्रक्षोभित करण्याचे काम त्यांनी कधी केली नाही. हळुवारपणे त्यांच्या मनाचे एक एक कप्पे ते उघडत असत. म्हणून लोक तल्लीन होऊन ऐकत असत. लोकांना तो आपला माणूस वाटत असे. जणू आपल्याच भावना, आपलेच प्रश्न, आपलीच सुखदु:खे त्यांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत असे श्रोत्यांना वाटत असे. भाषणात कसला दर्प नसे, राजकारणाची भाषा नसे. त्यातून त्यांचे शालीन, नम्र व्यक्तिमत्त्व प्रकट होत असे. या माणसाचे साहित्य कसे असेल? असा प्रश्न मनात आला. एक उत्सुकता निर्माण झाली व त्यांच्या साहित्याचा शोध घेण्याचे मनात आले.

यशवंतरावांचे साहित्य हे मूलत: समकालीन संकल्पनेशी निगडित आहे. त्यांच्या साहित्यात समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला प्रभावित करण्याची ताकद आहे. समाजाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसते. त्यांचे साहित्य हे वास्तवाच्या काळाला सामोरे जाणारे आहे. तत्कालीन काळाचा सखोलपणे त्यांनी वेध घेतला. त्यांचे साहित्य हे वर्तमानकाळाशी निगडित आहे, भूतकाळाला पचवणारी ताकद आहे आणि भविष्यकाळाची दृष्टी असणारी प्रवृत्ती त्यात आहे. हे आपल्याला जाणवते. असे असतानाही मराठी साहित्याच्या केंद्रवर्ती संस्थांनी या लेखकाची म्हणावी तशी दखल घेतली नाही, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. कारण मराठी वाङ्मय प्रकारात त्यांनी हाताळलेल्या वाङ्मयाने लक्षणीय भर घातली आहे. असे असतानासुद्धा वाङमयेतिहासाच्या ग्रंथात अथवा समीक्षात्मक ग्रंथातही त्यांच्या साहित्यकृतींना फारसे स्थान नाही. क्वचित ओझरता उल्लेख केलेला मात्र आढळतो. तेव्हा त्यांच्या समग्र व्यक्तिमत्तवाचा आणि वाड्मयाचा अभ्यास करून, त्यांचे वाङ्मयीन मोल दाखवून त्यांच्या साहित्याच्या क्षेत्रात झालेली उपेक्षा नाहशी करणे महत्त्वाचे वाटते. पश्चिम महाराष्ट्रातील या प्रतिभावंत लेखकाचे वाङ्मयीन गुणांवर मूल्याकंन करणे हे महाराष्ट्रातील अभ्यासकांचे नैतिक कर्तव्य आहे असे मला मनापासून वाटते.
यशवंतरावांसारख्या लेखकाचा अभ्यास करताना या लेखकाच्या व्यक्तित्वाचे सुप्त प्रकट पैलू, त्यांच्या वृत्तीचे गुणविशेष, त्याचा व त्यांच्या वाङ्मय निर्मितीचा, सकारात्मक वा नकारात्मक संबंध तपासणे महत्त्वाचे आहे. यशवंतरावांच्या साहित्यातून मला जे आकलन झाले त्यावर भर देऊन त्यांच्या या साहित्यकृतींचे मला घडलेले दर्शन प्रतिबिबित करण्याचा माझा मन:पूर्वक प्रयत्न आहे.