विरंगुळा - ३५

१० जानेवारी

परिषद आटोपून सकाळच्या विमानाने मुंबईत १२॥ वाजता परत आलो. दुपारी दोन ते सहा ऑफिसमध्ये 'थकबाकी' पुरी केली. सायंकाळी ६ नंतर काँग्रेस हाऊसमधे दुष्काळ निवारण समितीच्या सभेस हजर राहिलो.

११ जानेवारी

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतचा वेळ झक्क आळसात घालविला. दुपारी कार्यक्रमाची चक्कर सुरू झाली ती रात्री ११॥ पर्यंत. स्वामी रामकृष्ण मिशन संस्था आज ता. ११ ला प्रथमच पाहिली. आज मंगळवार. कॅबिनेट मिटींगनंतर कलेक्टरांची 'दुष्काळ परिषद' झाली. मी निमंत्रण लावून हजर होतो. श्री. भाऊसाहेब हिरे याबाबतीत मला टाळतात की काय अशी शंका माझ्या मनात आज अगदी प्रथमच येऊन गेली.

श्री. भाऊसाहेब हिरे यांचे कोयनेसंबंधीचे वक्तव्य वाचले. 'कोयनेचा महाराष्ट्राशी संबंध नाही. ती मुंबई शहराची योजना आहे.' अशी काकाछाप थाप त्यांनी ठोकून दिली. महाराष्ट्राशी कोयनेचा संबंध नव्हता, तर किर्लोस्करांशी सलगी करून तिचा पुरस्कार केल्याचे नाटक यांनी का केले? कोयनेची वीज मुंबई शहराला प्रमुखत: जाणार म्हणून ही योजना महाराष्ट्राची नव्हे या तर्कशास्त्राचा अर्थ मुंबईचा महाराष्ट्राशी संबंध नाही असा करावयाचा की काय? पण हे सर्व इतके सरळ आहे असे मी मानीत नाही. देअर इज सम सिस्टिम इन दि मॅडनेस!
------------------------------------------------------------

१३ जानेवारी

आज हैद्राबादला जाण्याची तयारी केली. रात्रीच्या गाडीने निघण्याचे ठरविले. सोलापूरपासून पुढे सकाळी उजाडताच प्रवास सुरू होतो. हा प्रदेश दिवसा पहावा हा खरा हेतू आहे.

रात्री नऊची मद्रास मेल कशीतरी सापडली. अगदी ऐनवेळी येऊन पोहोचण्याची आणि घाईघाईने निघण्याची सवय केव्हा जाणार? श्री. आबासाहेब वर्तक चांगले तासभर विरार येथून येऊन बोरीबंदरवर थांबले होते. गाडीत अनपेक्षितपणे श्री. अनंत काणेकर हे तिसरे सहप्रवासी सहज लाभले. त्यांच्या परिचयाची संधी आली. ते जशी सुंदर प्रवास वर्णने लिहितात तशी प्रवासातील हकीगतीही खाजगी गप्पाटप्पात चांगल्या रंगवितात. रात्री ११ पर्यंतचा वेळ कसा गेला समजलेच नाही.

१४ जानेवारी

सोलापूर ते हैद्राबादपर्यंत नवा प्रदेश प्रथमच पहात होतो. लांबपर्यंतची सपाट जमीन, सुंदर पिके पाहून थोडा हेवा वाटला यात शंका नाही. श्री. नाना कुंटे सकाळनंतर आमच्याच डब्यात 'कट्थ्रोट' खेळण्यासाठी आला होता. तो म्हणाला, ‘पेशवे व मराठे हा शेजारचा मुलूख निजामाला सोडून अटकेकडे झेंडे लावण्यासाठी का गेले होते कळत नाही.'